बौद्ध समाज
बौद्ध समाज
महाराष्ट्र टाइम्स | Updated: 06 Oct 2019, 08:59:00 AM
विद्यमान बौद्ध हे नागवंशीय असून ते या भूमीचे मूळ रहिवासी व राज्यकर्ते होते. आर्यपूर्व काळात नागलोकांची संस्कृती येथे अस्तित्वात होती. नागलोक म्हणजेच आजचे बौद्ध वा महार लोक होत. नागवंश हा भारतातील एक प्राचीन वंश आहे.
बौद्ध समाज
पुराणातील उल्लेखानुसार नागराजांनी विदिशा, मथुरा, कांतिपुरी व पद्मावती या ठिकाणी राज्य केले. महाराष्ट्र ही तर नागांची मायभूमीच होती. दक्षिण भारतात नागांची अनेक लहान लहान राज्ये होती. महाराष्ट्रातील नागराजे ‘महारठी’ ही पदवी धारण करीत. सातवाहन काळात ‘कळलाय’ हा नागराजा कर्नाटक, तेलंगण व महाराष्ट्र या प्रदेशावर राज्य करीत होता. त्याने आपली कन्या नागनिका हिचा विवाह सातवाहन राजा सिमुक सातकर्णीबरोबर केला होता. नागनिका ही सिमुक राजाची पट्टराणी होती. तिने अनेक यज्ञयागादी दानकर्मे केली. त्यासंबंधीचे कोरीव लेख नाणेघाटातील लयनगृहातील भिंतीवर पहायवास मिळतात.
प्राचीन काळातील नागलोकांचे वंशज आजचे बौद्ध (महार) आहेत, असे राजाराम शास्त्री भागवत यांनी म्हटले आहे. इतिहासचार्य वि. का. राजवाडे, प्र. न. देशपांडे, ह. श्री. शेणोलीकर, एच. एल. कोसारे, डॉ. एन. जी. भवरे, डॉ. भीमराव बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांनीसुद्धा वरील मतास पुष्टी दिली आहे. महारांच्या परंपरेनुसार महारांचा पहिला राजा नाग हा होता. नागलोक व नागराजे आपल्या नावात ‘नाग’ व ‘निका’ या शब्दांचा वापर करीत असत. चंद्रगुप्त दुसरा (विक्रमादित्य) याच्या राणीचे नाव कुबेरनागा होते. कळलाय राजाच्या मुलीचे नाव ‘नागलिका’ होते. पद्मावतीला ‘भवनाग, भीमनाग, बृहस्पतीनाग, देवनाग, गणपतीनाग, प्रभाकरनाग व स्कंदनाग या नावाचे राजे होऊन गेले. यावरून बौद्ध तथा महार लोकांचे प्राचीनत्व लक्षात येते. महारांच्या नावावरून या देशाला महाराष्ट्र असे नाव पडले आहे. जॉन विल्सन यांनी महारांचे राष्ट्र ते महाराष्ट्र अशी उत्पत्ती दिली आहे. महार+राष्ट्र = महाराष्ट्र असे होते. या उत्पत्तीला अलेक्झांडर रॉबर्टसन, महात्मा जोतिबा फुले, डॉ. एन. जी. भवरे, डॉ. दत्तात्रय पुरुषोत्तम खानापूरकर यांनीही या मताला दुजोरा दिला आहे.
👉कोकण हा प्रांत मुळात महार, मांग, भिल्ल, कोळी, ठाकूर व कोंग या लोकांचा होता.
१४ एप्रिल व ६ डिसेंबर अनुक्रमे डॉ. आंबेडकरांचा जन्म दिन व महानिर्वाण दिन म्हणून पाळतात. दसरा हा धम्मचक्र परिवर्तन दिन व वैशाखी पौर्णिमा बुद्धजयंती म्हणून मोठ्या उत्साहाने साजरे करतात. या दिवशी मिरवणुका व त्यास जोडून जाहीर सभा घेतल्या जातात. ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाऊन हॉलशेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बौद्ध समाज प्रचंड संख्येने मानवंदना देण्यासाठी जमतात. ठाण्यातील आंबेडकर रोडवरील दोन्ही दिवशी मोठे कार्यक्रम होतात.
गर्भमंगल, नामकरण, अन्नप्राशन, केशकर्तन, कान टोचणे, विद्यारंभ, विवाह व अंत्यसंस्कारापैकी नामकरण, विवाह व अंत्यविधी प्रामुख्याने करतात. मुलाच्या जन्मानंतर पाचव्या, सातव्या किंवा बाराव्या दिवशी नामकरणविधी करतात. बहुतेक तो बाराव्या दिवशीच करण्याचा प्रघात आहे. त्यावेळी अर्भक तसेच आईवडिलांनी पांढरे कपडे परिधान करायचे असतात. भगवान बौद्ध व डॉ. आंबेडकर यांच्या तसबिरींनी पांढरी फुले व हार घालतात. समोर उदबत्त्या व पाचपदरी पांढरा धागा बांधतात. भन्ते किंवा बौद्धाचार्य त्रिसरण व पंचशील म्हणतो. धाग्याचे एक टोक आपल्या हातात धरतो व बाकीचा धागा नवजात मूल, त्याचे आईवडील व उपस्थितांच्या हातात देतो. यानंतर तो बुद्ध, धम्म व संघवंदना तसेच रतन सुत्त, करणीयमेत सुत्त, महामंगल गाथा इत्यादी म्हणतो व पूजापाठ झाल्यावर तो मुलाचे नाव जाहीर करतो. त्याचवेळी धागा मुलाच्या व आईवडिलांच्या, आप्तेष्ट व इतरांच्या हातात बंधतो. धाग्यास फार पवित्र मानतात. सर्वसाधारण असा तऱ्हेचा कुंभाचा विधी सर्व धार्मिक विधीच्या वेळी तसेच परित्राण पाठ करतेवेळी करतात. कुंभातील पाणी तीर्थ म्हणून घेतात.
प्राचीन काळापासून ठाण्याच्या ग्रामव्यवस्थेचा भाग असलेला, विद्यमान बौद्ध समाज ठाणे परिसरात सर्वत्र मिसळून गेला आहे. ठाणे शहरात आंबेडकर चौक, खारटन रोड येथे प्रामुख्याने त्यांची वस्ती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेने प्रभावित या समाजाने शिक्षण घेऊन शिक्षक, शासकीय सेवा, सेनादल आणि विविध उद्योग क्षेत्रांत प्रगती करून राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिकदृष्ट्या सबल होत आधुनिक झेपावणाऱ्या ठाण्याच्या वाटचालीत त्यांचीही पावले उमटली आहेत.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा:
Web Title : buddhist society
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Comments
Post a Comment