भारत उत्तरेकडे कसा सरकतो?


भारत उत्तरेकडे कसा सरकतो?

 | Updated: 24 May 2015, 02:03:00 AM

गेल्या महिन्याभरात नेपाळमध्ये आलेले दोन्ही भूकंप हे भूगर्भातील भारतीय प्रतलाच्या हालचालीमुळेच आलेले आहेत. यावर सर्वच शास्त्रज्ञांचे एकमत आहे. भारतीय प्रतल हा युरेशीयन प्रतलाच्या खाली सरकण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे ही हालचाल होत असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. परंतु प्रतलाच्या हालचाली ही प्रक्रिया काही आजची किंवा काही वर्षांपूर्वीची नाही.

    
ललित पतकी 


गेल्या महिन्याभरात नेपाळमध्ये आलेले दोन्ही भूकंप हे भूगर्भातील भारतीय प्रतलाच्या हालचालीमुळेच आलेले आहेत. यावर सर्वच शास्त्रज्ञांचे एकमत आहे. भारतीय प्रतल हा युरेशीयन प्रतलाच्या खाली सरकण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे ही हालचाल होत असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. परंतु प्रतलाच्या हालचाली ही प्रक्रिया काही आजची किंवा काही वर्षांपूर्वीची नाही. ही प्रक्रिया लाखो वर्षांपासून सुरू आहे. या प्रक्रियेमुळेच भारत दरवर्षी ५ सेंटीमीटरने उत्तरेकडे सरकतो आहे. ही प्रक्रिया नेमकी कधी आणि कशी सुरू झाली असावी हे भू-गर्भ शास्त्रातील मोठे गूढ मानले जाते. ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी’ने सुद्धा यावर संशोधन करून एक शोधप्रबंध सादर केला आहे. 

हिमालयाचा जन्म 

१४० लक्ष वर्षांपूर्वी भारत देश हा गोंडवाना या विशालकाय खंडाचा एक भाग होता. दक्षिणी गोलार्धाचा एक फार मोठा भागसुद्धा याच खंडाने व्यापलेला होता. १२० लक्ष वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेनंतर भारत या खंडातून तुटला आणि हळुहळू उत्तरेकडे ५ सेंटीमीटर प्रती वर्ष या गतीने सरकू लागला. पुढे ८० लाख वर्षांपूर्वी हा खंड उत्तरेकडे अचानक १५ सेंटीमीटर प्रती वर्ष या गतीने सरकू लागला. ५० लाख वर्षांपूर्वी हा खंड युरेशियाशी धडकला आणि त्यातून हिमालयाचा जन्म झाला. 

गेल्या अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञांनी भारताच्या उत्तरेकडे सरकण्याच्या गतीवर संशोधन केले आहे. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथील शास्त्रज्ञांनीसुद्धा यावर आपला तर्क मांडला आहे. पृथ्वीच्या गर्भातील दोन प्रतलांच्या हालचालींमुळे ही गती वाढली असावी असा अंदाज लावण्यात येतो. यात एक प्रतल हा दुसऱ्या प्रतलाखाली सरकण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे दोन्ही प्रतलांची उर्जा ही पृथ्वीवरील जमीन आपल्यासोबत उत्तरेकडे खेचत आहे. त्यामुळे भारताची उत्तरेकडे सरकण्याची गती दिवसें दिवस वाढत आहे. परंतु कधी काळी झालेल्या शक्तीशाली ज्वालामुखींच्या साखळीनंतर ही गती प्राप्त झाली असावी, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला जात आहे. 


एमआयटीचे संशोधन 

एमआयटीच्या चमूने केल्या अध्ययनात हिमालयाच्या दगडांचे ‘कार्बन डेटिंग’ करून या दोन्ही प्रतलांचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला आहे. यावरून तयार करण्यात आलेल्या मॉडेल आधारे त्यांनी भारताच्या सरकण्याच्या गतीचा अंदाज बांधला आहे. हे दोन्ही प्रतल रुंद आणि एकमेकांपासून दूर असतील तर त्यांच्या हालचालींमुळे भारताची उत्तरेकडे सरकण्याची गती जास्त असेल. ‘भू-विज्ञानात कोणत्याही गोष्टीबाबत नेमकी भूमिका घेणे तसे कठीणच असते. परंतु हिमालयापासून मिळालेल्या काही पुराव्यांच्या आधारावर नेमका अंदाज बांधणे शक्य आहे,’ असे मत या चमुतील प्रा. लीग रॉयडन यांनी व्यक्त केला आहे. 

भू-वैज्ञानिक तत्त्वाच्या आधारे भारताचे स्थलांतरण हे १२० लाख वर्षांपूर्वीच सुरू झाले. गोंडवानापासून वेगळे झाल्यावर त्याकाळी असलेल्या टेथीस समुद्राच्या पलीकडे भारत जाऊ लागला. या समुद्रामुळेच गोंडवाना आणि युरेशिया वेगळे झाले असावे असा अंदाज आहे. पृथ्वीच्या गर्भातील ‘मॅग्मा’मुळे भारताची गती वाढली असावी. या मॅग्मामुळे झालेल्या ज्वालामुखीद्वारे या खंडाला तसेच भारताला ही गती प्राप्त झाली असावी, असा अंदाज २०११ मध्ये काही शास्त्रज्ञांनी लावला होता. परंतु ज्वालामुखीची कोणतीही प्रक्रिया ही ५ लाख वर्षांकरिता चालते आणि भारताच्या उत्तरेकडे गतीने सरकण्याची कालावधी हा तब्बल ३० लाख वर्षांचा आहे. त्यामुळे या थिअरीला समर्थन करणारे नेमके पुरावे मिळू शकले नाही. 

टेथीसमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक 

एमआयटीमधील तज्ज्ञांच्या मते भूगर्भातील प्रतलांच्या हालचालींमुळेच हे शक्य झाले असावे. हे दोन्ही प्रतल टेथीस समुद्राच्या मधोमध होते. २०१३ मध्ये या चमूने हिमालयात केलेल्या गिर्यारोहणादरम्यान त्यांनी हिमालयातील काही दगडांचे नमुने गोळा केले. या दगडांमध्ये पृथ्वीच्या चुंबकीय शक्तींचा अभ्यास करण्यात आला. याद्वारे पृथ्वीच्या कोणत्या चुंबकीय शक्तींमुळे हे दगड तयार झाले असतील याचा अंदाज लावण्यात आला. यावरून ८० लाख वर्षांपूर्वी टेथीस समुद्राच्या मधोमध प्रचंड शक्तीच्या ज्वालामुखींची एक साखळी तयार झाली असावी, याचे पुरावे मिळाले. तसेच दक्षिणेच्या काही भागातसुद्धा या प्रकारचे ज्वालामुखी झाले असावेत. ज्या भागात हे ज्वालामुखी झाले त्या भागातूनच भारताची गोंडवानापासून वेगळे होण्याची प्रक्रिया सुरू झाली असावी, असा या चमूचा विश्वास आहे. यावरून ‘डबल सबडक्शन’चे मॉडेल तयार करण्यात आले. त्याद्वारे प्रतलांच्या गतीचा अंदाज लावण्यात आला. या काळात पृथ्वीच्या आत आणि पृथ्वीच्या वातावरणातसुद्धा बरेच बदल घडून आले होते. त्यामुळे या दृष्टिकोनातून अभ्यास केल्यास त्याकाळातील वातावरणाच्या बदलांचीसुद्धा माहिती मिळू शकते, असा विश्वास एमआयटीच्या शास्त्रज्ञांना आहे. 

भारताची ११ उपकरणे 

भारतीय भू-चुंबकत्व संस्थेतर्फे (इंडियन इन्स्टिट्युट ऑफ जिओमॅग्नेटिझम) या प्रतलांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. या संस्थेचे मुख्यालय मुंबई येथे असून या संस्थेतर्फे हिमालयाच्या पायथ्याशी ११ विविध उपकरणे लावण्यात आली आहेत. या उपकरणे उपग्रहांशीसुद्धा जोडलेले आहेत. या ११ केंद्राद्वारे भू-चुंबकत्व, प्रतलांची हालचाल आणि गुरुत्वाकर्षण यांचा सखोल अभ्यास केला जात आहे. 

भूकंपांची शक्यता? 

नेपाळमध्ये २५ एप्रिल रोजी ७.९ रोजी रिश्टर स्केलचा भूकंप आल्यानंतर केवळ १७ दिवसांच्या कालावधीतच परत ७.६ रिश्टर स्केलचा भूकंप येणे असे आज वरच्या इतिहासात सहसा घडलेले नाही. एकाच परिसरात एका पाठोपाठ इतक्या तीव्रतेचे भूकंप येणे ही ‘रेअर केस’ असल्याचे मत भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या तज्ज्ञांमार्फत व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही भूकंप हे भू-गर्भातील प्रतलांच्या हालचालींमुळे आलेले असतील तर या प्रतलांची हालचाल अथवा गती वाढली असेल काय? तसेच त्यामुळे नजिकच्या काळात अजून काही भूकंप होतील काय? अशी भीती निर्माण होत आहे.

Comments

Popular posts from this blog

चांभारानी गणपती शिवल्या मुळे गणपती बाटला. म्हणून गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...!☝

अयोध्या

चोरावर मोर आणि पोपटपंची