राजा शिवछत्रपती आणि आक्षेप!


Showing posts with label दादोजी कोंडदेवShow all posts

Wednesday, May 6, 2015

राजा शिवछत्रपती आणि आक्षेप!

बाबासाहेब पुरंदरे यांच्या "राजा शिवछत्रपती" या पुस्तकातील काही विधानांबद्दल सध्या वादळ सुरु आहे. तसे हे वादळ आजचे नाही. गेली काही वर्ष ते अधुन मधुन डोके काढत सुरु आहे. पुरंदरेंना राज्य शासनाने "महाराष्ट्र भुषण" हा पुरस्कार दिल्याने हे वादळ आता तांडवात बदलण्याची शक्यता आहे. हा पुरस्कार शिवद्रोह्याला दिला जातो आहे असा प्रमुख आक्षेप असुन त्यासाठी त्यांच्या पुस्तकातील आक्षेपार्ह मानली जाणारी विधाने/पुस्तकातील मजकुराची पाने सोशल मिडियातुन वावटळीसारखी सर्वत्र पसरवली जात आहेत. यांचा प्रतिवाद करण्यासाठी पुरंदरेंचे समर्थकही सज्ज असतातच. पण आरोपक आणि प्रतिवाद्क यांतील एकंदरीत जो उग्र आवेश आहे तो अशा वादांना कधीही पुर्णविराम देवु शकणार नाही हे उघड आहे.

मी हे पुस्तक आजवर वाचले नव्हते. मला प्रासादिक/पाल्हाळीक/प्रवचनी/प्रचारकी/नाटकी पुस्तके वाचायला आवडत नाहीत. अकरावी-बारावीत असतांना पाबळच्या वाचनालयात कधीतरी हे पुस्तक हाती आले होते. पण चाळुन ठेवुन दिले. आता मात्र वाचणे भाग पडले. वाचले आहे. भाषा प्रभावी आणि प्रवाही आहे हे नक्कीच.

पुस्तकाच्या अंतरंगात शिरायच्या आधी नेटवर जी माहिती मिळते ती नमुद करतो. या ग्रंथाच्या सोळा आवृत्त्या आजवर प्रकाशित झाल्या असुन पाच लाख घरांत हे पुस्तक गेले आहे असे विकिपिडियावरील माहितीत म्हटले आहे. हे खरे मानले तर पाच लाख प्रती विकल्या गेल्या आहेत असे म्हणता येईल. कोणत्याही मराठी पुस्तकाच्या एवढ्या प्रती मराठीत विकल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे "पुरंदरेंनी शिवाजी महाराजांना घरोघर पोहोचवले." हे विधान अतिशयोक्त असले तरी बहुसंख्य मराठी जनांपर्यंत पोहोचवले हे मान्यच करावे लागेल. इतर कोणतेही पुस्तकरुपात प्रकाशित शिवचरित्र हा विक्रम मोडु शकलेले नाही असे स्पष्ट दिसते. शिवाय शिवाजी महाराजांवर त्यांनी असंख्य व्याख्यानेही दिलेली आहेत. ग.ह. खरेंसारखे विद्वान इतिहास संशोधक त्यांना गुरुस्थानी लाभले असेही दिसते. "बाबासाहेब पुरंदरे याणी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला." असेही विकीत नमुद आहे. असे असेल तर बाबासाहेब पुरंदरे केवळ शिवशाहीर नसुन इतिहास संशोधकही आहेत असेच म्हणावे लागेल. समजा नसले तरी शिवचरित्र लिहायचे म्हणजे त्यांना त्याकाळी जी साधने उपलब्ध होतील त्यातील काही साधने तरी त्यांना संदर्भासाठी वापरावे लागलीच असतील हे गृहित धरावे लागेल. शिवाय इतिहासकार होण्यासाठी कोणाकडे कसली पदवी असलीच पाहिजे हेही बंधन नसते, त्यामुळे "पदवी दाखवा" हा आक्षेपही योग्य नाही. तरीही शाहीर व इतिहास संशोधक म्हणून त्याही अंगाने राजा शिवछत्रपती या पुस्तकाकडे पहावे लागेल.


ते रा. स्व. संघाशी तरुणपणापासुन संपर्कात होते अशीही माहिती यात नमुद असुन ते स्वत: स्वयंसेवक होते कि नाही याबाबत खात्रीशीर माहिती नाही.

त्यांनी इतरही लेखन केले असुन या विषयाशी संबंधीत त्यांचे "जाणता राजा" हे एक महानाट्य असुन त्याचे असंख्य प्रयोग झाले आहेत. अर्थात यावरही आक्षेप आहेत, पण ते नाटक मी पाहिलेले नसल्याने त्याबाबत काही लिहु शकणार नाही. पण हेही नाटक लाखो लोकांनी पाहिलेले आहे. किंमान अशा प्रकारचा महाराष्ट्रात झालेला (होत असलेलाही) एकमेव प्रयोग आहे असे नक्कीच म्हणावे लागेल.

आता पुस्तकाबाबत आणि आक्षेपांबाबत.

या पुस्तकाची प्रथमावृत्ती प्रसिद्ध होऊन सहा तरी दशके उलटली असतील. पुरंदरेंचा जन्म १९२१चा. म्हणजे हे पुस्तक लिहायला लागलेला संभाव्य कालावधी लक्षात घेता ते लिहित्यावेळीस तिशीत असावेत. मी चवदावी आवृत्ती (२००१) वाचुन आक्षेपांव्रील खालील निरिक्षणे नोंदवत आहे.

आक्षेप १)

"मराठा जहागीरदार, सरदारांना स्वाभिमान नाही, कुळाशिळाची चाड नाही, बेअब्रूची चीड नाही, हे लाचार, स्वार्थी, गुलाम पुरुष मोठेपणासाठी स्वत:ची आई सुद्धा विकायला कमी करणार नाहीत." (पान ८३) असे सांगुन या विधानावर सर्वात जास्त प्रक्षोभ व्यक्त केला जातो. हे विधान देतांना पुढील संदर्भ दिला जातो.(- ब. मो. पुरंदरे , राजा शिव छत्रपती पा. ८३ , जुनी आवृत्ती ) संदर्भासठी खालील लिंक देत आहे.   http://babapurandare.blogspot.in/2010/09/blog-post.html  http://vishvamarathi.blogspot.in/2012/06/blog-post_28.html
सर्चमद्ध्ये अनेक मिळतात. अनंत दारवटकरांनी न्यायालयात विचारलेल्या प्रश्नावर पुरंदरे निरुत्तर झाले असेही सांगितले जाते.


माझ्याकडील आवृत्ती २००१ मधील आहे. १४ वर्ष जुनी. या आवृत्तीत पृष्ठ क्रमांक ८३ वरच नेमके काय म्हटले आहे हे पाहुयात:

"ती असंतुष्ट होती. जहागीरदारांची आणि सरदारांची तिला चीड येई. यांना स्वाभिमान नाही, कुळाशीलाची चाड नाही, बेअब्रुची चीड नाही. मोठेपणासाठी स्वत:ची आईसुद्धा विकायला कमी करणार नाहीत हे लाचार, स्वार्थी, गुलाम. पुरुष कसले हे? देव, देश आणि धर्म प्रतिपाळील तोच पुरुष!"

दोन्ही उद्घ्रुते शांतपणे पडताळुन पहा. पुरंदरेंच्या पुस्तकात या विधानात मुळात ’मराठा’ शब्दच नाही हे सहज लक्षात येईल. हा शब्द कोठुन आणला? हे विधान करतांना लेखकाने तत्कालीन महाराष्ट्रातील अनागोंदी चितारत हे विधान केले आहे हे सलग वाचले तर स्पष्ट दिसते. सरदार-जहागिरदार फक्त मराठा होते कि काय? मुरारपंत जोगदेव सरदार नव्हता काय? तो कोण होता? वरील विधान सरसकट सर्वच महाराष्ट्री जहागिरदार-सरदारांबाबत आहे, त्यात ब्राह्मणाला सुटका दिली आहे असे दिसते आहे काय?


दुसरे महत्वाचे असे कि पुरंदरेंनी मराठा हा शब्द पुस्तकात मराठी माणुस म्हणुन वापरला आहे. जात म्हणून नाही. जेथे जेथे जात अनुस्युत आहे तेथे काय म्हटले आहे तेही पाहुयात:

 "क्षत्रीय मराठ्यांच्या तलवारी आणि ब्राह्मण मराठ्यांच्या लेखण्या सुलतानांच्या सेवेंत दासींबटकींच्या अदबीने आणी नेकीने रमल्या होत्या." (पान ५५). विधान स्वयंस्पष्ट आहे. येथे मराठा जातीचा जसा उल्लेख आहे तसेच ब्राह्मणांचाही आहे. अन्यत्र मराठा जात ही कुळवंत अथवा शहाण्णव कुळी या विशेषणासहित उल्लेखली आहे. दोहोंना सारखेच झोडपले आहे असे स्पष्ट दिसेल.

मराठा जातीविषयी येणारा अजुन एक उल्लेख पहा, : "आणि या मंडळींना ओळखलत का? हे त्र्यंबकजीराजे भोसले, हे जिवाजीराजे भोसले, हे बाळाजीराजे भोसले, हे परसोजीराजे भोसले. ही खाशी खाशी भोसले मंडळी महाराजांच्या रक्ताची भाऊबंद होती.........पण काय लिहायचे आता?" (पान ३५८)

ही हतबुद्धता संतापाच्या रुपाने कोठे उमटली तर लेखकाला दोष द्यायचा कि परिस्थितीला? महाराजांपेक्षा या अशा "९६ कुळी म-हाटे" (हा पुरंदरेंचा या संदर्भातच पुढच्याच परिच्छेदांत येणारा शब्द), त्यातही निकटच्या नातेवाईक मंडळीला शाइस्तेखान जवळचा वाटला आणि त्याला जाऊन मिळाले. हे वास्तव नसेल तर पुराव्यांनीच खोडले पाहिजे. पण या विधानाबाबत कोणी आक्षेपच घेतल्याचे वाचनात नसल्याने हे विधान सर्वमान्य आहे असा अर्थ सहज घेता येइल.


आक्षेप २) " शिवबा दहा वर्षाचा झाला. मुलगा येवढा मोठा झाला ..... लग्नाचे वय आई साहेब आणि पंत कुजबुजू लागले. ठरले ! फलटणच्या नाईक निंबाळकर यांची लेक आई साहेबांच्या नजरेत भरली. पंतानी शहाजी महाराज यांना पत्र पाठवले, हे लग्न पंतानी हौसेने केले... " हे विधान आक्षेपार्ह मानले गेले आहे कारण यातील "कुजबुज" हा शब्द आणि हे लग्न पंतांनी हौसेने केले, म्हणजे शहाजीराजांना डावलले. एक चाकर शहाजीराजांपेक्षा मोठा झाला का असा हा आक्षेप आहे.

याला जोडुनच दुसरा आक्षेप या विधानावर... "आईसाहेबांवर ते फार माया करीत. ही बाई अशी तशी नाही, हिची जडणघडण कांही वेगळीच आहे, हे त्यांनी ओळखले होते. शिवबांवर तर खुद्द शहाजीराजांचाहि नसेल एवढा जीव पंतांचा होता..........पंत देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण. गोत्र? - गोत्र शांडिल्य. पण खरे म्हणजे त्यांचे, आईसाहेबांचे शिवबांचे गोत्र एकच होते-सह्याद्रि! प्रचंड अवघड सह्याद्रि! पंत भारदस्त होते. जबरदस्त होते. सह्याद्रीसारखेच!"  (पान १२६)

या विधानातील ’गोत्र’ एकच या शब्दावर आक्षेप आहे, तसेच ’ते फार माया करीत’ आणी ’शिवबांवर  तर खुद्द शहाजीराजांचाहि नसेल एवढा जीव पंतांचा होता."


पण याच्याच आधी पान १२५ वर काय म्हटलेय तेही पाहुयात.

"राजांच्या घरातले ते मानाचे, धाकाचे, दरा-याचे, मायेचे आणि ममतेचे वडिलधारे पुरुष होते. ते सर्वांवर हक्काने रागवत अन हक्काने प्रेम करत." (पान १२५).

पुन्हा हा पाठचा संदर्भ असतांना हे वाक्य वाचुन काही ओळी (ज्यात सत्तर वर्षीय दादोजींच्या राजकीय अनुभवांबाबत सांगण्यात जातात.) गेल्यानंतर येणारे आक्षेपार्ह मानले जाणारे विधान पाहिले तर कोण सुज्ञ पुरुष ते आक्षेपार्ह मानेल? ’वडिलधारे’ या शब्दातच माया ममतेचा अर्थ सामावला आहे.

राहिले आता गोत्राचे. गोत्र ही वैदिक धर्मीय  संकल्पना आहे. पुरंदरेही "उत्तरेत वैदिक धर्माचा, वैदिक राज्यांचा आणि वैदिक संस्कृतीचा हे सुलतान विध्वंस करत होते, त्याच काळात महाराष्ट्रांतले धर्ममार्तंड पोथ्या उलथ्यापालथ्या करत खल करत बसले होते." (पान २५) असे विधान करतात. या वाक्याला माझा आक्षेप नाही कारण वैदिक धर्म स्वतंत्र आहे, वेगळा आहे हे मी सांगतच आलो आहे. त्यांनी उत्तरेतील कोणाला वैदिक मानले हे मी सांगु शकत नाही कारण त्यांनी ते स्पष्टही केलेले नाही. पण तो येथे मुद्दा नसुन गोत्राचा आहे.

पुरंदरे उपमा-उत्प्रेक्षा पेरत लेखन करतात हे कोणाच्याही सहज लक्षात येईल. गोत्र म्हणजे काय? शूद्र वगळता सर्वांना (तीन वर्णांना) गोत्र असते. गोत्र म्हणजे ऋग्वेद रचना करणा-या ऋषींचे थेट वंशज. रक्तसंबंधी. महाभारत काळात गोत्रे फक्त चार होती. ती म्हणजे अंगिरस, कश्यप, भृगू आणि वशिष्ठ. नंतर ती आठ बनली. त्यांच्याच वंशांत गोत्रकर्ते ऋषी झाल्याने ही संख्या आता चारशेच्या पुढे गेली आहे. ही का संख्या वाढली त्याचे उत्तर मी अन्यत्र दिलेले आहे.

वरील विधानात दादोजींचे मुळ गोत्र शांडिल्य दिले आहे पण त्यात शिवबांचे मुळ गोत्र दिलेले नाही. जे नाही ते कसे देणार? पण अनेक जे मराठे आज स्वत:ला क्षत्रीय समजतात त्यांनी याचा विचार करावा. असो.

तर पुरंदरेंनी येथे प्रत्यक्ष सह्याद्रीची उपमा देत सह्याद्री गोत्र ठरवले यात काव्यमय आणि महाराष्ट्राची खरी ओळख आहे. त्याच्याच अंगाखांद्यांवर खेळणारे मावळे यांचा नि वैदिक ऋषी गोत्राचा काय संबंध? हा सम्बंध महाराष्ट्रावरील प्रेमापोटी आणलेला आहे. गोत्र सह्याद्री म्हटल्यावर राग येत असेल तर अवघड आहे.

आता दादोजींना ते गुरु मानतात काय? शिक्षक मानतात काय हेही त्यांच्याच शब्दात पाहुयात:

"पण पंतांचे सर्वात बारकाईने लक्ष असे ते शिवबांच्या शिक्षणावर. लिहिणे-वाचणे शिकवण्यासाठी नेमलेल्या गुरुजींपाशी शिवबा बसे. ’ (पान १२७)

यात गुरुजीतुन गुरु आणि शिक्षणातुन शिक्षण हे दोन्ही शब्द आले आहेत. दादोजी गुरु होते असे पुरंदरेंनी ठामपणे कोठेही म्हटलेले नाही. न्यायनिवाड्यांत व अन्य राजकार्यात ते शिवबांना बरोबर ठेवत असे म्हटले आहे पण कोठेही "गुरु" शब्द येत नाही. येतो तो एका संस्कृत सुभाषितात, पण त्याचा अर्थ दादोजी गुरु होते असा काढणे म्हणजे मुद्दाम अनर्थ करणे होय. रामदासांबाबतही असेच आहे, पण त्याबाबत नंतर.

म्हणजे, एकदा वडिलधारेपणा दिला गेलेला माणुस माया करतो यात गैरार्थ काढणे विकृती म्हणता येईल.

हे झाले पुस्तकातील विधानांबाबत. आक्षेपांबाबत आणि त्यातील फोलपणाबाबत. पण दादोजींचा संबंध भोसले घराण्याशी चाकर म्हणून कधीच नव्हता. जोही काही होता तो कोंढाण्याचे सुभेदार म्हनून हे मी सिद्ध करुन दाखवले आहे. जहागिरदाराचा चाकर आणि सुभेदार यातील फरक मोगलकालीन प्रशासन व महसुल पद्धतीबाबत  नीट माहिती नसल्याने सुभेदार हा जहागिरदारापेक्षा मोठा असतो, एकच नव्हे तर परिसरातील अनेक जहागिरदार, मोकासदार, मिरासदार ते वतनदार हे त्याच्या महसुल व स्थानिक न्याय या संदर्भात सुभेदाराच्या अंकित असतात हे लक्षात घेतले पाहिजे. पुरंदरेही दादोजींना "नामजाद सुभेदार" (पान १२६) म्हणुन नंतर नेमले असे म्हणतात. नामजाद सुभेदार हे पद नाही. शिवाजी महाराजांच्या दादोजीसंबंधी चार अस्सल पत्रात "दादोजी कोंडदेवु सुभेदार" असाच उल्लेख आहे. सुभेदार केंद्रीय सत्तेचा प्रतिनिधी असे. महसुल, जमीनी लागवडीखाली आणने, गांवे वसवने, जातपंचायतींच्या निवाड्यांना मान्यता देणे (मजहरनामे) अशा त्याच्या जबाबदा-या असत.

जहागीर, मोकासा हे अस्थिर हक्कांचे स्वामी असत. केंद्रीय सत्तेची मर्जी असेपर्यंत ते कायम रहात अन्यथा ते काढुनही घेतले जात असत. याउलट वतन अथवा इनाम हे मात्र वंशपरंपरेने कायमचे असत. (महाराष्ट्र आणि मराठे, ले. अ.रा. कुलकर्णी, पान २९)

सुभेदार कोणत्याही जहागिरदाराचा चाकर असु शकत नव्हता हे येथे स्पष्ट होईल. त्यामुळे दादोजींबाबतचे सर्वच प्रसंग काल्पनिक/कविकल्पना/प्रक्षिप्त दंतकथा या सदरात टाकुन देता येईल. दादोजींबाबतच्या जुन्या कल्पना दोन-तीन वर्षापर्यंत कायम होत्या. दादोजी आणि शिवराय यांचा संबंध नाही हे इतिहासकार मेहंदळेंनीही ३०-३२ वर्षांपुर्वी मान्यच केले आहे. (संदर्भासाठी पहा: http://sanjaysonawani.blogspot.in/2012/02/blog-post_06.html ) ब्रिगेडी इतिहासकार मात्र उलट माझा लेख येईपर्यंत दादोजींचा उल्लेख "शहाजीराजांचा सामान्य चाकर अथवा नगण्य नोकर " असा करत असत. हे त्यांचेही जर अज्ञान होते तर समजा पुरंदरेंचेही (१९५८ साली) मोगलकालीन महसुलपद्धतीबाबत असेल तर त्यात धक्कादायक काय आहे?

शिवाय प्रस्तुत पुस्तकात दादोजींच्या मृत्युनंतर फक्त एकदाच ओझरता उल्लेख आहे हेही लक्षात घेतले पाहिजे. अडिच प्रकरणांत इतर विषयांबरोबरच दादोजी प्रकरण आटोपते. (पुस्तकात एकुण ५२ प्रकरणे आहेत.)

आक्षेप ३) पुस्तकात ब्राह्मण माहात्म्य अधिक असुन शिवाजी महाराजांची प्रतिमा हिंदुत्ववादी व मुस्लिम विरोधी दाखवण्यात आली आहे.

हा आक्षेप अनेक शब्दांत, अनेक पद्धतीने नोंदवण्यात आला असल्याने मी फक्त आरोपाचा गाभा मांडला आहे. वरील आक्षेपांसाठी आपण पुस्तकातील काही नमुने पाहुयात.

यासाठी पान ८० व ८१ वाचले पाहिजे.  यात चार दिर्घ परिच्छेदांत वेदशास्त्रसम्पन्न ब्राह्मण केवढ्या नालायक्यांना पोहोचले होते याचे उद्वेगजनक वर्णन आहे. "नाशिक येथे ऐलतीरावरील मंदिरे फुटत असतांना पैलतीरावर वेदोनारायण पळींपंचपात्री घेऊन तिरिमिरीने भांडत होते. कशासाठी? तर, यात्रेकरुंपैकी ऋग्वेद्यांची पिंडॆ कोणी पाडायचीं आणी यजुर्वेद्यांची पिंडे कोणीं पाडायची यासाठी!!" ते "वेदशास्त्र संपन्न शास्त्री-पंडित केवळ वर्षासनाच्या भिकेसाठी, ’श्रीगोदातटाकीं आणि श्रीकृष्णातटाकीं स्नानसंध्या करुन हजरतसाहेबास दुवा देत."

ब्राह्मणही या विधानामुळे पुरंदरेंच्या मागे का लागले नाही हे समजत नाही. वरील मजकुरालाच थोड्या अंतराने जोडून "एकदा मने विकली की जपण्यासारखे काही उरतच नाही. कांहीही लिलावाला निघते. बायकासुद्धा!" असे पुरंदरे  ब्राह्मणांची इज्जत काढून म्हणतात. पण आक्षेप याला नाही...

आक्षेप वेगळाच आहे.

वरील विधानानंतर सध्याच्या वादात आक्षेपार्ह मानले गेलेले अंतराने येणारे वाक्य म्हणजे, "ब-या, नीटस, गो-या जातीवंत कुणबिणी" बाजारांत सहज ’पंचविस होनांस पांच’ विकत मिळत होत्या." हे होय.

कुणबी आणि मराठे एकच असल्याने हे विधान मराठा पुरुषांची बदनामी करणारे आहे असे म्हटले जाते. वरकरणी पाहता ते खरेही वाटेल. अर्थात या वाक्याआधीचे ब्राह्मणांबाबतचे उद्वेग कसे व्यक्त झाले आहेत हे आपण थोडक्यात पाहिले.

१६३० च्या प्रलयंकारी दुष्काळात ’पुरुष बायका-मुलांना टाकुन जात होते. स्त्रिया, स्वता:ला गुलाम म्हणून  विकून घेत. आया बालकांची विक्री करीत." असे हृदयद्रावक वर्णण डच व्यापारी व्ह्यन ट्विस्टने करुन ठेवले आहे. या दुष्काळाची वर्णने तुकाराम महाराज, रामदास, परमानंद यांनीसुद्धा करुन ठेवली आहेत. तुकोबांचे तर नुसते दिवाळे निघाले नाही तर पत्नी व मुलही गमवावे लागले. या दु:ष्काळात होनाजी निबरे नांवाच्या गृहस्थाने घर व जमीन २५ होनास विकली असे पत्रसारसंग्रह ३२९ मद्धे नमुद आहे. अशी त्याकाळातील अगणित उदाहरणे आहेत. इअतकी कि माणुस मृत माणसाला खात होता. (वरील माहितीसाठी संदर्भ: मराठे आणि महाराष्ट्र, ले. अ. रा. कुलकर्णी, पान १०८ ते ११६) आणि पुरंदरेंचे विवेचन नेमके १६२९-३० या काळातील स्थितीचे आहे. दुष्काळातील आहे.

पुरंदरेंनी कुणबिण शब्द वापरला आहे आणि कुणब्याची बायको अथवा मुलगी म्हणजे कुणबीण असा अर्थ येथे घेतला गेलेला दिसतो.  त्यामुळे वितंड आहे. मराठा म्हणजे कुणबी हे सध्या समीकरण तेजीत असल्याने पुरंदरेंनी मराठा बायकांची बदनामी केली असा समज होने स्वाभाविक आहे.

पण वास्तव काय आहे?

कुणबीन म्हणजे कुणब्याची बायको-पोर तर बटकी कोण होती? ती कोणाची बायको-पोर होती?

कुणबीण हा रखेली या शब्दाचा प्रतिशब्द होता. कुणब्याची बायको म्हणून तत्कालीन स्थितीत तो अभिप्रेतही नव्हता. याचे शिवकालापासुन, खुद्द शिअवरायांच्या पत्रांतील पुराव्वे उपलब्ध आहेत. बटकी म्हणजे घरकामासाठी राबणारी. कुणबीन म्हणजे कुणब्याची बायको/पोर नव्हे तर एखाद्या माणसाची विक्रय झालेली शय्यासोबतीन. भावीण या शब्दाचा अर्थ भावेंची बायको असा होत नाही तसेच हे आहे. दोन्ही सर्वस्वी वेगळ्या संज्ञा आहेत. यात लग्न अभिप्रेत नाही. ब्रिटिश काळ येईपर्यंत, स्त्रीयांची खरेदी/विक्री थांबेपर्यंत ही प्रथा होती. कुणबीन म्हणजे कुणब्याची बायको असा अर्थ नसुन रोमन व बायबल काळापासुन चालत आलेल्या ल्यटिन "Concubine" या शब्दाचा तो मराठी अपभ्रंश आहे. या शब्दाचा इंग्रजी डिक्शनरीतील अर्थ आहे "a woman who cohabits with a man to whom she is not legally married, especially one regarded as socially or sexually subservient; mistress.". थोडक्यात ठेवलेली बाई. मग ती विकत घेतलेली असेल वा ती स्वेच्छेने राहत असेल. याचा कुणबी जातीशी संबंध जोडणारे व कुणबी समाजाची स्वत:हुन बदनामी करुन घेणारे किती मुर्ख?

जसा बटकीन या शब्दाचा जातीय अर्थ नाही तसाच कुणबिण या शब्दाचाही जातीय अर्थ नाही. कुणबिणी आणि बटकिणींचे क्रय-विक्रय हा महाराष्ट्रातील (अन्यत्र वेगळ्या नांवांनी) सुरु असलेला फार जुना व्यवसाय आहे. पेशवे काळातही शनिवार वाड्यासमोर कुणबिण-बटकिणींचे बाजार भरत व पाच रुपये ते ऐंशी रुपये दराने त्यांची खरेदी होत असे अशा नोंदी उपलब्ध आहेत. आणि या विकावु स्त्रीया कुणबाऊ समाजाच्या असत असे नव्हे तर बव्हंशी सर्वच जातीतील असत. अशा सर्व स्त्रीयांना कुणबीन अशी संज्ञा होती. यामद्धे एकजातीयता शोधणे अनैतिहासिक आहे. किंबहुना हा वेगळाच वर्ग होता ज्यात कोणत्याही जात/धर्माची स्त्री असु शके. 

आक्षेप ४)  हिंदुत्ववादी पुरंदरे मुस्लिम द्वेष्टे असुन शिवाजी महाराजांच्या मुस्लिम सेवक/सेनानींबद्दल ते नामोल्लेख करत नाहीत.

आपण पुरंदरेंच्याच पुस्तकातील काही उतारे पाहु.

१. पान २४६ वर पहा. "या वेळीस महाराजांचे मुख्य मुख्य अंमलदार महाराजांच्या बरोबर घोडे दौडीत होते. पुढीलप्रमाणे हे अधिकारी होते. शामराज नीळकंठ रांझेकर (पंत पेशवे).........नुरखान बेग सरनौबत (पायदळाचे सरसेनापती.)." , नेताजी पालकरांच्या सोबतीने सिद्दी हिलाल आहे. त्याचा मुलगा वाहवाह आहे. त्यांची स्वराज्यासाठीची अविरत दौड आहे. मुस्लिम म्हणुन लेखकाने त्यांना हिणवल्याचे दिसत नाही.

२. ’स्वराज्य वाढले. किती साधी माणसे ही? कुणी कुलकर्णी होता. कुणी रामोशी होता. कुणी मुसलमान होता. कुणी न्हावी होता. कुणी भंडारी होता. कुणी देशपांडे होता. कुणी महार होता. कुणी शेतकरी होता. पण ह्या सामान्य माणसांनीच एकवटून असामान्य इतिहास निर्माण केला." (पान ४०७) .

३. "केळशी येथे बाबा याकूत हे थोर अवलिये राहत होते. अल्लाच्या चिंतनावाचुन त्यांना दुसरे आकर्षण नव्हतें. अमीर वा फकीर त्यांना सारखेच वाटत. सच्चे परवरदिगार रहमदिल होते ते. महाराज त्यांच्या दर्शनास केळशीस आले व त्यांचे दर्शन घेऊन जंजि-याच्या मुकाबल्यास त्यांनी हात घातला." (पान ९३८)

४. औरंगजेब उत्तरकाळात विक्षिप्त झाला. धर्मवेडाने वागु लागला. "बाटवाबाटवी तर फार स्वस्त झाली. खरोखर त्या थोर प्रेषिताच्या पवित्र व ’सत्य’ धर्माची अवहेलना त्याचेच अनुयायी म्हणवुन घेणारे करु लागले. औरंगजेब तर मुळचाच धर्मवेडा. कुराण शरीफ तोंडपाठ करुनहि बिचा-याला त्यांतील ईश्वरी तत्वाचा बोध होऊ शकला नाही." हे सांगुन लेखक म्हणतो...

"औरंगजेबाचे हे धर्मवेडे चाळे महाराजांना समजले. त्यांना अत्यंत दु:ख झाले. कीव आली. रागहि आला. कोणता धर्म असा वेडगळ उपदेश करील, की लोकांवर क्रुर जुलुम करा, अन्याय करा म्हणून? धर्माचा संस्थापक म्हणजे इंश्वराचा अवतार. पेमदयाशांतीचा गोड सागर. कोणत्या धर्मसंस्थापकाने असें सांगितले आहे की, माझ्या शिकवणुकीचा प्रचार करण्यासाठी वटेल ते क्रुर अत्याचार करा म्हणुन? असे कोणीही सांगितलेले नाही." (पान ७५७)

हे वरील वाचता (मी नमुने दिले आहेत...असे अनेक आहेत.) पुरंदरेंना मुस्लिम द्वेष्टे म्हणेल? तरीही अजुन तुमची खात्री पटावी म्हणून सर्वच लोकांबद्दल त्यंची काय भावना आहे हे खालील वाक्यावरुन लक्षात येईल...

"स्वराज्य वाढले. किती साधी माणसे ही? कुणी कुलकर्णी होता. कुणी रामोशी होता. कुणी मुसलमान होता. कुणी न्हावी होता. कुणी भंडारी होता. कुणी देशपांडे होता. कुणी महार होता. कुणी शेतकरी होता. पण ह्या सामान्य माणसांनीच एकवटून असामान्य इतिहास निर्माण केला." (पान ४०७).

यानंतरही त्यांना एकाच जातीचे पक्षपाती ठ्रवायचे असेल तर खुशाल ठरवावे. खरे तर मुस्लिम हा शब्दच मुळात हजार पाने पुस्तकात दोन-तीनदा आला आहे. त्याऐवजी. अफगाणी, मोगल, निजामशाही, अदिलशाही,सुलतान-सुलतानी असेच शब्द अधिकांश वापरलेले आहेत. मुर्तीभंजनाचा खेद व उद्वेग सर्वत्र दिसतो. त्यात काही प्रसंगी अतिशयोक्तीही आहे. पण त्यातुन मराठी माणुस (मी आता मराठा शब्द टाळु म्हणतो.) आपत्तीविरुद्ध, आक्रमकांविरुद्ध आणि पारतंत्र्याविरुद्ध उभा राहत नाही, उलट स्वत्वे विकत गुलाम होतो याची चीड दिसते.

आक्षेप ५) फुटकळ मुद्द्यांना मी आता उत्तरे देत बसत नाही आणि कोणाचा वेळ वाया घालवु इच्छित नाही. पण तरीही आयबीएन लोकमतवर जिजाउंना कुंतीसारखे व्हायचे म्हणजे काय हा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी चर्चेत केला होता. त्या संदर्भातील वाक्यही पुरेपुर तपासुन घेऊ. तत्पुर्वी याच पुस्तकातील पान क्र. ११३ वरील शहाजीराजांच्या स्वातंत्र्य धडपडईबाबत लिहितांना लेखक म्हणतो, ..." स्वातंत्रेच्छू सर्व धडपडींचे मुळ कोठे असेल आणि त्यांचे अंत:करण चेतवणारी, सुलतानशाहीविरुद्ध बंडाची प्रेरणा देणारी आणि स्वत:च सत्ताधीश ’राजे’ बनावे, अशी महत्वाकांक्षा फुंकरुन फुंकरुन फुलविणारी कोणती शक्ति राजांच्या मागे होती?

"इतिहासाला माहित नाही. पण ती शक्ति, ती व्यक्ति असावी जिजाबाईसाहेब! शहाजीराजांच्या राणीसाहेब!" (पान क्र. ११३)

आता आव्हाडांच्या आक्षेपाकडे जावू. 

कुंतीसंबंधाने आव्हाडांनी अर्धवट विधान केले. संपुर्ण विधान असे आहे...जेंव्हा जिजाऊ गरोदर होत्या तेंव्हाचे.

"तिला रामायण , महाभारत फार फार आवडे. राम, हनुमान, सीता, कृष्ण, द्रौपदी, कुंती, विदुला या सर्वांच्या कथा ऐकतांना तिच्या मनावर विलक्षण परिणाम होई. तिला वाटे, आपण नाही का कुंतीच्या पंगतीला बसु शकणार? तिचा भीम, तिचा अर्जुन अत्यंत पराक्रमी निपजले. त्यांनी राक्षस आणि कौरव मारले. सुखसम्रुद्ध धर्मराज्य स्थापन केले. कुंती वीरमाता, राजमाता ठरली. मला तिच्या पंक्तीला बसायचेय! बसेल का?"

सोळाव्या शतकातील स्त्री-पुरुषांची मानसिकता काय होती? कुंतीला वरदानाने देवांपासुन मुले झाली. त्यात कोणाला कधी अश्लाघ्य वाटले नव्हते. विसाव्या शतकातही वाटत नाही. याला ब्राह्मणी अथवा वैदिक मानसिकता म्हणा. पण वरील विधानात "कुंतीला दैवी वराने नव्हे तर प्रत्यक्ष नियोगाने अथवा व्यभिचाराने मुले झाली" हे अलीकडचे आकलन तेथे लादुन कसे चालेल? अर्थ एवढाच आहे कि पांडवांपैकी पराक्रमी असलेल्या भीम आणि अर्जुनाप्रमाणे मुल व्हावे. मग कर्णाचे नांव पुरंदरेंनी घेतले नाही म्हणूनही छाती पिटता येईलच.

कोणतीही मिथककथा लक्षणार्थी घ्यायची कि वाच्यर्थ याचे भान सुटले तर काय होनार? पुराणकथा ऐकतच बहुजन वाढले. आजही किर्तन सप्ते लावणारे कोण आहेत? याच भाकडकतथा सांगणारे बहुतेक किरतनकार आज बहुजनच आहेत. आपलेच पुरुष, स्त्रीया आणि मुले ते ऐकत आहेत. पण त्यांना विरोध नाही.

मग विरोध कोणाला आहे?

कोणालाही करोत. सत्याला अंध विरोध मान्य नसतो. पुरंदरेंवर केले जाणारे आरोप मात्र केवळ वरकरणी ब्राह्मणी द्वेषातुन आहेत. हे, म्हणजे संघीय मुख्यमंत्री सिंधखेडराजाला यांच्या मांडीला मांडी लावुन बसणार आणि टुक्कार अनुयायांन्च्या हाती स्वर्ग देणार. नेत्यांचे खरे अंतर्मन तरी कोठे माहित आहे?

तरीही नि:ष्कर्ष: 

पुरंदरेंना इतिहास सांगायचा नसुन आक्रमक, पारतंत्र्य आणि स्वराज्य यातील भेद ठळक करण्यासाठी एक प्रेरकता निर्माण करायची आहे असा सर्व पुस्तक वाचल्यानंतरचा एकमेव उद्देश दिसतो. इतर ब्राह्मणी लेखकांनी रामदासांचे फाजील लाड केलेत तसे पुरंदरेंनी कोठेही केलेले दिसत नाही. दादोजी हे शिवजीवनातील एक दुरस्थ पात्र आहे. पण तत्कालीन समजुतींनुसार त्यांनी ते आपल्या कादंबरीत रंगवले आहे. पण त्यात जिजाऊंचा अवमान करण्याचा उद्देश्य दिसत नाही. मुस्लिम द्वेष नसुन स्वजन नाकर्ते आहेत याचा लेखकाला अधिक रोष दिसतो व त्याबद्दलचा संताप काही ठिकाणी व्यक्त झाला आहे. कुणनी-बटकिणी या संज्ञा जातीय नसुनही कुणब्याची पोरगी किंवा बायको असा सरधोपट अर्थ घेण्यात आला आहे. प्रत्यक्षात विकत जाणा-या कुणबिणी कोणत्याही जातीतील असत व त्याचा अर्थ  रखेल असा व्हायचा. बटकिण म्हणजे घरकामासाठी विकत घेतलेली बाई. हे शब्द ज्यांनी जन्माला घातले ते दोषी आहेत. स्वराज्यासाठी उपयोगी ठरलेल्या मुस्लिमांना त्यांनी  डावलले आहे असेही दिसत नाही. इस्लामबद्दल शिवाजीमहाराजांच्याच माध्यमातुन लेखक काय म्हणतो हे मी वर नमुद केलेच आहे. त्यात कोठेही इस्लामबाबत द्वेषभावना दिसत नाही. संघविचारी इस्लामचा द्वेष करतात हे जगजाहीर आहे. या कादंबरीपुरते तरी मी म्हणू शकतो कि संघविचाराच्या प्रभावातील ही कादंबरी नाही. कादंबरीत भावनोद्रेकिता, परिस्थितीवरील चडफडाट जसा आहे तशा अतिशयोक्त्याही आहेत. देवगिरीचे साम्राज्य कोसळल्यानंतर परिस्थितीची हतबलता महाराष्ट्रावर आलीच नव्हती असेही कोणी म्हणु शकणार नाही. अतिशयोक्तीचा भाग कादंबरी म्हणून वगळला कि अशा स्वरुपाच्या घटना घडल्याच नाहीत असे म्हणायचे धाडस कादंबरी वाचल्यानंतर कोणी करु शकणार नाही. मागचे पुढचे संदर्भ न घेता एखादेच विधान व शब्द वेठीस धरले तर जगातील सर्वच पुस्तकांवर आक्षेप घेता येतील. पुस्तक लिहिल्यानंतर पुढील काळात त्यांच्या (पुरंदरेंच्या) विचारांत/निष्ठेत बदल झाला असेल तर त्यावरची चर्चा वेगळी बाब आहे. पण त्यांच्यावर आपल्या मनात येईल ते थोपणे योग्य नाही. पुस्तकातील भाषा ही आलंकारिक आहे. प्रभावी व प्रवाही आहे. अलंकारिकतेच्या तत्कालीन खांडेकरी पद्धतीचा तो दोष आहे. तरीही एक साहित्यप्रकार म्हणून त्यात रचनाशैलीचे अनेक दोष आहेत. पण त्याची समिक्षा साहित्य समिक्षकांनी केली पाहिजे.ती समिक्षा करणे हा या लेखाचा उद्देशही नाही. जे आक्षेप घेतले जात आहेत त्यावर भाष्य करणे हा एकमेव हेतु यामागे आहे. मी दिलेली उत्तर शक्यतो पुरंदरेंच्याच मुळ पुस्तकात काय आहे आणि आक्षेप काय आहेत यावर केंद्रित केले आहे.

-संजय सोनवनी

Monday, February 6, 2012

दादोजी कोंडदेव...पुन्हा-पुन्हा...निरर्थक!

गजानन भास्कर मेहंदळे यांनी म.टा. ला दिलेल्या मुलाखतीत दादोजी कोंडदेवांची भलावन करणारी व त्यांचा पुतळा उखडण्याबद्दलचा रोष व्यक्त करणारी काही विधाने प्रसिद्ध झाली होती. खरे तर हा प्रकार म्हनजे शिळ्या कढीला उत आनण्याचा प्रकार होता. त्याचा प्रतिरोध म्हणुन मी खालील व्यापक भुमिका मांडली होती जी म.टा. ने प्रसिद्ध केली. ती अशी...



इतिहाससंशोधन विश्वसनीय कसे होणार?
1 Jan 2012, 0000 hrs IST 

संजय सोनवणी 

इतिहास हा मानवी मनावर प्रभाव गाजवणारा फार महत्त्वाचा घटक असतो. इतिहास हा कसा सांगितला गेला आहे, यावर समाजाचे त्याबाबतचे आकलन अवलंबून असले तरी सामान्य माणसांवर प्रत्यक्ष घडलेल्या इतिहासापेक्षा वदंतांचा अधिक प्रभाव असतो. इतिहास हा जेत्यांचा वा समाजवर्चस्ववादी घटकांच्या वा वर्चस्ववादी होवू पाहणाऱ्यांच्या मानसिक तुष्टीकरणासाठी लिहिला जात असल्याने तो तटस्थ व निरपेक्ष असतोच असे नाही. दुसरे असे की, इतिहासकार हासुद्धा एक मनुष्यच असल्याने त्याच्या लेखनावर त्याच्या समजुती, पूर्वग्रह आणि त्यानुरुप असलेल्या त्याच्या व्यक्तिगत आकलनाचा प्रभाव पडत असतो. अनेकदा एकाच पुराव्याचे आकलन/विश्लेषण इतिहासकारपरत्वे बदलत असते. या नियमाला अपवाद नसतात असे नाही. परंतु मग त्यांनाही त्यांच्या नव्या संशोधनामुळे सामाजिक पूर्वग्रहांना, रुढ समजुतींना धक्का बसत असल्याने लोकांच्या रोषाला तांेड द्यावे लागते आणि त्यातून जी वादळे निर्माण होतात त्यामुळे पूर्वग्रहविरहित, संपूर्ण ज्ञान-चिकित्सात्मक इतिहाससंशोधनास खीळ बसते. 

खरे तर सातत्याने इतिहास संशोधने यासाठीच व्हायला हवीत की कोणावरही अकारण अन्याय होऊ नये, तसेच कोणाचे अकारण उदात्तीकरण झाले असेल तर तेही लोकांसमोर यावे. पण मूळ इतिहास हा वर्चस्ववादी भूमिकेतून लिहिला गेला असल्याने, कोणाचे उदात्तीकरण करायचे, कोणाला बदनाम करून ठेवायचे आणि कोणाला गडप करून टाकायचे ही एकाअर्थाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणत त्याप्रमाणे 'इतिहासविघातक प्रवृत्ती' होती आणि आजही ती शेष असावी हे एक महाराष्ट्राचे दुदैर्र्व आहे. 

शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समोर आणला जात असताना, ज्येष्ठ-श्रेष्ठ आणि रात्रंदिवस राबून अनमोल कार्य केलेले संशोधकही दुदैर्र्वाने या इतिहासविघातक दृष्टीपासून मुक्त राहिले नाहीत. खरेतर आज इतिहास अधिकाधिक नि:पक्षपाती होत जाण्याची गरज आहे. परंतु अशा उज्ज्वल इतिहासात आपल्याही जातीघटकाचे वर्चस्व कोणत्या ना कोणत्या रूपात असले पाहिजे, या भावनेतून प्रत्यक्षाप्रत्यक्षरित्या संत रामदास आणि दादोजी कांेडदेवांबाबतचे समज गतशतकापासून जोपासले जात आहेत. दादोजी हे बालपणीचे गुरु तर रामदास हे मोठेपणीचे गुरु अशी ही मांडणी आहे. ते खरे असते आणि निविर्वाद पुराव्यांनी सिद्ध झाले असते तर ते मान्य करायलाही कोणाचीही हरकत नव्हती. पूवीर् न. र. फाटकांनी रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते हे सत्य खणखणीतपणे मांडले होते. पण अजूनही अनेक इतिहासकार वारंवार तिय्यम दर्जाच्या बनावट साधनांचा आधार घेत वारंवार शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न करत असतात. ज्येष्ठ इतिहासकार गजानन भास्कर मेहंदळे यांनी 'शिवाजी : हिज लाइफ अॅण्ड पिरियड' या नव्या चरित्रात्मक ग्रंथाच्या निमित्ताने महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत (१७ डिसेंबर २०११), शिवाजी महाराजांचे कोणीच गुरु नव्हते असे म्हटले आहे. ते म्हणतात, 'शिवकालाविषयी जे अस्सल पुरावे आहेत त्यात कोठेही दादोजी कांेडदेव हे शिवरायांचे गुरु होते असे म्हटलेले नाही. तसा उल्लेखही कोठे सापडत नाही, हे मी ३० वर्षांपूवीर्च लिहून ठेवले आहे. परंतु त्याचबरोबर माझे असेही म्हणणे आहे की, दादोजी हे चांगले गृहस्थ असल्याची आणि त्यांच्या न्यायदानाविषयी शिफारस करणारी शिवाजी महाराजांची स्वत:ची चार पत्रे उपलब्ध आहेत. म्हणजे तो माणूस नालायक तर नव्हता? शिवाजीराजे किंवा शहाजीराजे यांनी जी कामगिरी सोपवली ती सुविहितपणे पार पाडली होती. मग इतिहासात होऊन गेलेल्या त्या व्यक्तीसाठी एवढा गहजब का?' 

इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे मात्र जवळपास तीच इतिहासाची साधने वापरत दादोजी कांेडदेव हे शिवाजी महाराजांचे शिक्षक होते, दादोजींबद्दल शिवाजी महाराजांना पराकोटीचा आदर होता व दादोजींच्या निधनानंतर त्यांना खूप शोक झाला, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. 

दादोजी हे आजीवन आदिलशहाचे कांेडाणा व दौंड प्रांताचे सुभेदार होते. या सुभेदारीच्या प्रदेशातच शहाजी महाराजांची पुणे व ३६ गावांची जहागिरी होती. दादोजी जे वतन/जमीनींच्या वादांबाबत निवाडे करत ते आदिलशहाचा सुभेदार या नात्याने, त्याच्या सुभेदारीच्या क्षेत्रात. तेही मलिक अंबरने घालून दिलेल्या महसुल पद्धतीनुसार. मलिक अंबरची ही महसुलाची पद्धत जवळपास देशभर स्वीकारली गेली होती. त्यामुळे ते प्रदेश आपल्या स्वामित्वाखाली आणल्यानंतर त्यासंबधीचे दादोजींचे निवाडे पुढेही शिवाजी महाराजांनी कायम ठेवले, एवढेच त्या चार पत्रांवरून सिद्ध होते. पण यातून त्यांनी शिवाजी महाराज वा शहाजीराजांचे सेवक या नात्याने ते निवाडे केले होते हे कोठे सिद्ध होते? 

दादोजी हे आदिलशहाचे मृत्युपावेतो सुभेदार होते. महसुलाच्या हिशोबात काही गफलत झाल्याने आदिलशहाने घोरपडे सरदारांना कांेडाण्यावर चालून जायला सांगितले होते व दादोजींची हार झाल्यानंतर खरे तर देहान्त शासनच व्हायचे, परंतु ब्रह्माहत्या हे महत्पापात गणले गेले असल्याने हातावर निभावले. या संदर्भातील पुरावे दुर्लक्षिण्याचे कारण काय? ते असत्य असतील तर त्याबाबत संशोधनपर चर्चा करून त्यांचा निकाल का लावला जात नाही? 'मग इतिहासात होऊन गेलेल्या या व्यक्तीचा पुतळा उखडून फेकण्याचे कारण काय?' असा प्रश्न गजानन मेहंदळे यांनी विचारला आहे. तो समजा रास्त मानला, तर मग दादोजी व शिवाजी महाराज वा शहाजी महाराज यांचा नेमका संबंध काय, हेही अस्सल पुराव्यांनिशी सिद्ध करायला हवे. दादोजींनी आपल्या हयातीत कांेडाणा शिवाजी महाराजांना का मिळू दिला नाही यावरचेही संशोधन मांडायला हवे. दादोजींबाबत ज्यांना आदर आहे त्यांच्यासाठी त्यांचा स्वतंत्र पुतळा नक्कीच असू शकतो, परंतु ज्या इतिहासाशी त्यांचा संबंध आदिलशहाचा सुभेदार या नात्याने आहे तो बाजूला ठेवून त्यांना शिवेतिहासातील महत्त्वाची व्यक्ती कसे म्हटले जाऊ शकते? 

१६३० साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. इतका की लोक मृत जनावरे आणि शेवटी तर मृत माणसांचेही मांस खाऊन जगायचा प्रयत्न करत होते. गावेच्या गावे ओस पडली होती. या दुष्काळाला थोरला दुष्काळ म्हणतात. या दुष्काळाचे हृदयदावक वर्णन व्हॅन ट्विस्ट या डच व्यापाऱ्याने लिहून ठेवले आहे. तुकाराम महाराजांनीही आपल्या अनेक अभंगांत या प्रलयंकारी दुष्काळाची वर्णने केलेली आहेत. दादोजींनी दुष्काळ ओसरल्यानंतर गावे पुन्हा वसवण्याची कामगिरी सुरू केली, ती त्या प्रांताचा सुभेदार या नात्याने. ती त्यांची जबाबदारीच होती. त्यात त्यांची कार्यक्षमता मान्य करायलाच हवी, पण शहाजीराजे आदिलशाहीत गेले ते १६३६ मध्येे हेही येथे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे शहाजीराजांच्या आज्ञेने त्यांनी गावे वसवली हा दावा निराधार ठरतो. घटनाक्रमात अशी अदलाबदल करून काय साध्य केले जातेे? याला इतिहास संशोधन म्हणायचे का, असा प्रश्न प्रत्येक इतिहासकाराने स्वत:लाच विचारला पाहिजे. 

इतिहासकाराच्या सदसद्विवेकबुद्धीवर सर्वसामान्यांचा पराकोटीचा विश्वास असतो. सारी साधने त्यांना सर्वांना अभ्यासने शक्य नसते. इतिहासकाराने इतिहासाचे केलेले मूल्यांकन त्यांच्या दृष्टिकोनात, ज्ञानात नवी भर टाकत असते. त्यातून समाजऐक्याची भावना निर्माण होत असते. आधीचज जातीय अस्मिता टोकदारच नव्हेत तर काटेरी होत आहेत, हे आपण अनुभवत असताना किमान जातीसापेक्ष अहंगंड सुखावण्यासाठी काही विधाने संबंधित पुरावे चचेर्तही न घेता केली गेली तर तो इतिहास, कितीही शिस्त असली तरी, अविश्वसनीय होणार नाही का? इतिहाससंशोधन वर्चस्ववादी मानसिकतेतून झाले तर आपण आपले भवितव्य कसे घडवणार? 


खरे तर या लेखात मी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर द्यायला हवे होते ते श्री मेहंदळे यांनी. पण बहुदा त्यांना उत्तर सुचले नसावे... पण बराच वेळ घेवुन प्रत्युत्तर दिले ते श्री कौस्तुभ कस्तुरे यांनी माझ्या वरील लेखातील मुख्य मुद्द्यांना पुर्ण बगल देत, लेनचा विक्रुत विषय जो मी टाळला होता तो करत दादोजींना त्यांच्या समाजाचे महापुरुष ठरवत अगदी विनाकारण रामदासांनाही वेठीला धरले. त्यांचा माझ्या वरील लेखाला प्रत्य्त्तर देनारा हा लेख...


वर्चस्ववादी मानसिकता
22 Jan 2012, 0000 hrs IST 

SMS NEWS to 58888 for latest updates
कौस्तुभ कस्तुरे 

गेल्या काही दिवसात दादोजी कोंडदेव हे मराठ्यांच्या इतिहासातलं वादग्रस्त प्रकरणं ठरलं आहे. इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांनी त्यांच्या मुलाखतीत दादोजी कोंडदेव यांच्या केलेल्या समर्थनाचं संजय सोनवणी यांनी जोरदार खंडन केलं होतं. सोनवणी यांच्या मतांचा प्रतिवाद करणारा हा लेख... 

' इतिहास संशोधन विश्वसनीय कसे होणार?' (रविवार, दि. १ जाने.) हा संजय सोनवणी यांचा, ज्येष्ठ इतिहास-संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या प्रतिपादनाचा प्रतिवाद करणारा लेख वाचला. मेहेंदळे हे अत्यंत निरपेक्ष आणि श्रेष्ठ असे इतिहास संशोधक आहेत. त्यांनी दादोजी कोंडदेव मलठणकरांविषयी मांडलेली मतं (संवाद - १८ डिसें. २०११) योग्यच आहेत. दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचे उल्लेख असणारे प्रत्यक्ष पुरावे नसले तरीही, ते चांगले गृहस्थ असल्याची आणि त्यांच्या न्यायदानाविषयी खुद्द शिवाजी महाराजांची शिफारसपत्र उपलब्ध असताना दादोजींच्या चारित्र्यावर चिखलफेक करणं हा कोणता पराक्रम? कोण कुठला तो जेम्स लेन आणि त्याने त्याच्या पुस्तकात काहीतरी मूर्खासारखं लिहिलं आणि आमच्याच सरकारने आमच्याच महापुरुषाचा पुतळा भर मध्यरात्री दिवाभीतासारखा उखडून टाकला. आजही महाराष्ट्राला संस्कृतीपेक्षाही विकृतीच जवळची वाटते हेच यावरून दिसून येतं. मेहेंदळे यांनी उपस्थित केलेला पुढचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे - 'शिवाजी महाराजांचे दादोजीच नव्हे, तर इतर कोणीच गुरू नव्हता, तसा एकही पुरावा उपलब्ध नाही!' तर मग शिवाजी महाराजांचे गुरू नसलेल्या अनेकांचे पुतळे अजूनही उभेच आहेत त्यांचं काय? देहुरोडमधील तुकाराम हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचा लेखी अस्सल पुरावा आज उपलब्ध आहे का? असेल तर तो आधी सादर व्हावा! 

सोनवणी म्हणतात की, मूळ इतिहास हा वर्चस्ववादी भूमिकेतून लिहिला गेला आहे आणि कोणाचे उदात्तीकरण वा कोणाला बदनाम करायचे हे आधीपासूनच ठरले होते. अर्थातच याविषयी बोलताना एका कटू पण सत्य गोष्टीकडे लक्ष वेधावे वाटते, ती गोष्ट म्हणजे अर्थात 'जातीयवाद'! दादोजी आणि समर्थ हे दोघेही ब्राह्माण असल्याने ब्राह्माण इतिहासकारांनी त्यांचे स्तोम माजवले, असा अपप्रचार केला जातो. परंतु अस्सल पुरावे मात्र वेगळंच सांगतात. महाराजांच्या समकालीन असणाऱ्या कृष्णाजी अनंत मजालसी उर्फ सभासदाच्या बखरीत किंवा खुद्द परमानंद गोविंद नेवासकरांच्या 'शिवभारता'त, जो अत्यंत विश्वसनीय पुरावा मानला जातो त्यात शहाजीराजांनी दादोजींना जिजाऊ आणि शिवाजी महाराजांसोबत कारभारी म्हणून पाठवले आणि इतकेच नव्हे तर त्यांना 'सरकारकून' म्हणजे 'मुख्य कारभारी' म्हणून नेमल्याचे उल्लेख आहेत. शिवाय भारत इतिहास संशोधक मंडळाच्या 'शिवचरित्र साहित्य खंड' यामध्ये पुणे आणि कर्यात मावळ पुन्हा वसवण्याचे काम दादोजींनी जिजाऊंच्या सल्ल्याने केल्याचा (आदिलशाही सुभेदार म्हणून नव्हे!) स्पष्ट उल्लेख आहे. 'रानातल्या जनावरांचा अन चोरांचा पंतांनी बंदोबस्त केला (संदर्भ : एक्याण्णव कलमी बखर).' इतिहासाचार्य राजवाडे यांनी त्यांच्या 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' या ग्रंथाच्या सतराव्या आणि अठराव्या खंडात दादोजींनी केलेले अनेक 'महजरनामे' प्रसिद्ध केले आहेत. याच्या चौथ्या खंडात महाराजांनी दादाजी नरसप्रभू गुप्ते यांना लिहिलेले एक पत्र आहे त्यात महाराज म्हणतात - 'श्री रोहिरेश्वर तुमचे खोरियातील आदि कुलदेव तुमचा डोंगरमाथा पठारालगत स्वयंभू आहे. त्याणी आम्हांस यश दिल्हे... राजश्री दादापंतांचे विद्यमाने (दादोजी कोंडदेवांच्या मदतीने) बाबाचे व तुमचे व आमचे श्रीपासी इमान जाहले...' म्हणजेच शिवाजी महाराजांच्या कार्याला दादोजींचा पाठिंबा होता, ते आदिलशाहीचे 'नाममात्र' सुभेदार होते हे स्पष्टच कळून येते. यातच सोनवणी यांनी उपस्थित केलेल्या 'दादोजींनी शिवाजी महाराज वा दादोजींचे सेवक या नात्याने निवाडे केले हे कोठे सिद्ध होते?' या प्रश्नाचे उत्तर सहज मिळते. 

दादोजींनी १६३० ते १६३६च्या दरम्यानची अनेक कामे 'आदिलशाही सुभेदार' या नात्याने केली असतीलही, परंतु १६३६मध्ये त्यांना शहाजीराजांनी आपला कारभारी नेमल्यानंतर या म्हाताऱ्या निष्ठावंत सरकारकुनाने अखेरपर्यंत भोसले घराण्याची सेवाच केली आणि १६३६नंतरची बहुतांश कामे जिजाऊंच्या आज्ञेने केल्याचे अनेक उल्लेख सापडतात. त्यांनी केलेली सुधारणेची कामे ही दुष्काळानंतरची असण्यापेक्षाही आदिलशाही सरदारांनी पुणे प्रांतात घातलेल्या जुलूमी धुमाकूळानंतरची आहेत हेही लक्षात घेतले पाहिजे. इतिहासलेखन हे वर्चस्ववादी भूमिकेतून झाले असे बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा वरील अस्सल साधने तपासून इतिहासाचे मूल्यमापन करणेच अधिक इष्ट ठरेल. 

' तथाकथित शिवप्रेमी' केवळ ब्राह्माणद्वेषाने सत्य इतिहास दडपून नवीन प्रतिइतिहास मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे 'महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळा'च्या इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील दादोजींचे उल्लेख वगळून 'शिवरायांचे शिक्षण शहाजीराजांच्या देखरेखीखाली' झाल्याचे दाखवले आहे. हे पाहून हसावे का रडावे तेच समजेनासे झाले आहे. इ.स. १६३६च्या सुरुवातीसच शहाजीराजांची 'निजामशाही' मोंगल आणि आदिलशाहाने बुडवली. शाहजहानने आदिलशहाला बजावले की, राजांना महाराष्ट्रात न ठेवता दूर कर्नाटकात पाठवावे. त्याप्रमाणे आदिलशहाने राजांची पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूरची जहागीर पूर्ववत चालू ठेवून राजांना कायमचे कर्नाटकात पाठवले. राजे दूर बंगलोरला (बंगळुरु) स्थायिक झाले व अखेरपर्यंत ते पुन्हा परत महाराष्ट्रात आल्याचे उल्लेख नाहीत; तर मग पुण्यात राहणाऱ्या बाल शिवबांचे शिक्षण त्यांच्या देखरेखीखाली कसे झाले? 

सोनवणी म्हणतात की, दादोजींचा शिवैतिहासाशी संबंध नसून ते फक्त आदिलशाही सुभेदार होते. तेव्हा सोनवणी यांनी वरील पुरावे तपासून पहावेत. पेशवाईतही महादजी शिंद्यांनी दिल्लीच्या बादशहाकडून स्वत:ला 'वकील-इ-मुतालिक' ही पदवी घेतली होतीच की! परंतु म्हणून काही महादजी पेशव्यांना सोडून मोंगलांचे 'मनसबदार' झाले नव्हते. ते पद फक्त नाममात्र होते. नेमकी हीच गोष्ट दादोजींच्या बाबतीतही आहे. 

सोनवणी म्हणतात ते खरे आहे- आधीच जातीय अस्मिता टोकदारच नव्हे, तर काटेरी होत आहेत. मात्र आजपर्यंतचे बहुतांश इतिहाससंशोधन हे निरपेक्षपणे झालेले आहे. म्हणायचेच झाले, तर सध्याच्या तो़डफोड करणाऱ्या शिवप्रेमींची मानसिकता पाहता इतिहासाचे 'कथित पुनलेर्खन' हे वर्चस्ववादी मानसिकतेतून होऊ लागले आहे. दादोजी कोंडदेव मलठणकर आणि रामदासस्वामी हे त्याचे पहिले बळी ठरले. 


या लेखाला माझे खालील उत्तर प्रसिद्ध झाले...शक्य असतांनाही मी त्यात दादोजी खुनी कसा होता...त्याच्या हात कापण्यामागील इतिहास सांगत बसलो नाही...कारण त्यांच्या व्यक्तिगत चारित्र्याशी मला काही घेणे-देणे नव्हते. मुख्य मुद्दे होते ते मी खालील प्रत्युत्तरात मांडले आहेत...




खरे वर्चस्ववादी कोण?
5 Feb 2012, 0000 hrs IST 

SMS NEWS to 58888 for latest updates
शिवाजीमहाराजांचे गुरू मानल्या गेलेल्या दादोजी कोंडदेव यांच्याविषयी ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदेळे यांनी केलेल्या विधानांवर संजय सोनवणी यांनी आक्षेप घेतला होता. नंतर सोनवणी यांच्या लेखाचा प्रतिरोध करणारा आणि मेहेंदळे व दादोजींची बाजू मांडणारा लेख कौस्तुभ कस्तुरे यांनी लिहिला होता. आता कस्तुरे यांच्या लेखाला उत्तर देणारा संजय सोनवणी यांचा हा लेख छापून, या वादावर इथेच पडदा टाकत आहोत. 

कौस्तुभ कस्तुरे यांची 'वर्चस्ववादी मानसिकता' ही गजानन भास्कर मेहंदळे यांनी दादोजी कांेडदेव यांच्या संदर्भात केलेल्या विधानांचे खंडन करणाऱ्या माझ्या 'इतिहास संशोधन विश्वसनीय कसे होणार?' या लेखावरची प्रतिक्रिया वाचली. गजानन भास्कर मेहंदळे या निरपेक्ष आणि श्रेष्ठ अशा इतिहासकाराची दादोजी कोंडदेव मलठणकरांविषयी मांडलेली मते योग्यच आहेत, असा त्यांचा अभिप्रायही वाचला. मूळ मुद्याला बगल देत कसे लेखन करावे हे कस्तुरे यांच्याकडूनच शिकायला हवे हेही पटले. परंतु त्यांनी 'नाममात्र सुभेदार' असे दादोजींचे वर्णन करताना ही 'पदवी' कोठून शोधून काढली हे ते लिहायला विसरलेले दिसतात. त्यांना मोगलकालीन प्रशासनव्यवस्थेचे काडीएवढेही ज्ञान नाही, हे त्यांनीच सिद्ध केले आहे. किंबहुना हीच लबाडी आजतागायत केली जात आहे. किमान दादोजी आदिलशहाचे सुभेदार होते (मग ते नाममात्र का म्हणेनात) हे मान्य तरी केले याबद्दल त्यांचे आभार मानलेच पाहिजेत! 

पण कस्तुरेंच्या माहितीसाठी सांगतो की 'सुभेदार' हा नेहमीच केंद्रीय सत्तेचा प्रतिनिधी असे. महसुल/जमीन सीमादींचे वाद-विवाद याबाबत निवाडे करण्याचे अधिकार सर्वस्वी सुभेदाराच्या हाती असत. गावे वसवणे, ज्यायोगे महसूल वाढेल अशी अधिकाधिक जमीन लागवडीखाली आणणे, ही कर्तव्ये सुभेदारालाच करावी लागत. कंेदीय सत्ता कधीही महत्त्वाचे किल्ले (उदा. कांेडाणा, पुरंदर) जहागीरदारांच्या नव्हे तर, आपल्यामार्फत सुभेदाराच्या अखत्यारित ठेवत असत. जहागीरदारांच्या अखत्यारित असलेच तर दुय्यम दर्जाचे किल्ले असत. जहागीरदारांना प्रशासकीय प्रक्रियेत व न्यायदानासंदर्भात कसलाही अधिकारच नव्हता. महसूल आणि न्यायदान (प्रशासकीय व्यवस्था) हेच कंेदीय सत्तेची सार्वभौमता ठरवत असते. अशा स्थितीत शहाजी महाराज (व इ.स.१६४२ नंतर स्वराज्याची स्थापना करेपर्यंत शिवाजी महाराज) जहागीरदार असल्यामुळे त्यांना न्यायदान करण्याचा अधिकारच नव्हता, तर मग त्यांचे कारभारी असलेल्या दादोजींना कसा असू शकेल, हा साधा प्रश्न या इतिहासकारांना पडला नसेल (वा माहीत असूनही ते सांगत नसतील तर) आणि 'दादोजी असले तर आदिलशहाचे नाममात्र सुभेदार', होते असे खुळचट विधान केले जात असेल तर ज्येष्ठ-श्रेष्ठ आणि निरपेक्ष म्हणवून घेणाऱ्या इतिहासकारांचीच वर्चस्ववादी दांभिक भूमिका वारंवार स्पष्ट होते. 

दादोजी कोणत्याही स्थितीत शहाजीराजांनी नियुक्त केलेले कारभारी नव्हते, असूही शकत नाहीत. कारण सुभेदाराचा दर्जा हा कारभाऱ्यापेक्षा मोठा असतो आणि दादोजी आजीवन सुभेदारपदावरच होते, हे मान्य करायला एवढे लाजायचे कारण काय? त्यांचे निवाडे स्वतंत्र झाल्यानंतरही शिवाजी महाराजांनी कायम ठेवले याचा एवढाच अर्थ निघतो की, मलिक अंबरच्या महसूल पद्धतीचे उत्तम आचरण दादोजींनी केले होते. त्याबद्दल त्यांना शाबासकी देता येते. ती देऊ, पण शिवाजीमहाराजांशी त्यांचा संबंध जोडण्याचे काय कारण? 

रामदासांचा मुद्दा कस्तुरंेनी जाणीवपूर्वक घुसवला आहे. ते विसरतात की ज्ञानेश्वर, एकनाथ, चक्रधरादि ब्राह्माणांचा बहुजनांनी नेहमीच सन्मान केला आहे. मग वाद रामदासांबद्दल का? कारण भाकड कथा निर्माण करून, त्यांना येनकेनप्रकारेण शिवाजी महाराजांचा आध्यात्मिक गुरू बनवले गेले. कसलेही बनावट दुय्यम-तिय्यम दर्जाचे पुरावे फेकायचे आणि त्यांना अस्सल म्हणवत आपलेच घोडे पुढे रेटायचे हा वर्चस्ववाद कस्तुरंेना वा त्यांच्या समर्थकांना समजत नाही असे नाही. 'ते करतात ते इतिहास संशोधन आणि इतर करतात ते जुने गाडलेले मुडदे उखडणारे विवेचन' अशी त्यांची अत्यंत बालिश मांडणी आहे. 

' आमच्याच सरकारने आमच्या महापुरुषाचा पुतळा भर रात्री दिवाभीतासारखा उखडून टाकला', हे कस्तुरंेचे विधान हे मेहंदळंेच्या मुलाखतीतील विधानाची पुढची आवृत्ती आहे. दादोजीसमर्थक दंगा करून शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आणतील ही भीती सरकारला असल्याने त्यांनी रात्री पुतळा काढला. ही भीती रास्त होती हे कस्तुरंेनीच सिद्ध करून दाखवले आहे. त्यामागे दादोजींचे नाव काही कारण नसताना शिवचरित्राशी जोडले गेले होते, हे एक कारण तर होतेच; पण लेन नामक कथित इतिहासकाराने पुण्यातील वावड्यांचा हवाला देत ( Street Joke ) शिवाजी महाराजांच्या जैविक पितृत्वाचे श्रेय दादोजींना दिले होते. असल्या नीच मानसिकतेला लाल महालातील अनैतिहासिक पुतळा जर बळ पुरवीत असेल, तर तो तेथून हलवणे हे शासनाचे कर्तव्यच होते आणि शासनाने ते बजावले. तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराजांच्या देहुरोड येथील पुतळ्याबदल कस्तुरंेनी विषय सोडून विधान केले आहे. तो पुतळा मुळात वादग्रस्त नाही. दादोजीहटाव प्रकरण नुसते लेनमुळे नव्हे, तर ज्या विकृती विशिष्ट समाज गेली २५-३० वर्षं खाजगीत चघळत आला आहे, त्याची अपरिहार्य परिणती होती. आजही दादोजींबद्दल खोटे पुरावे देत 'ते गुरु नव्हते, पण भले माणूस तर होते. मग त्यांचा पुतळा उखडायचे काय कारण?' असा आलाप करून जी मानसिकता दर्शवली जात आहे ती बघता लेनचे बोलवते धनी कोण हे ओळखायला मोठ्या बुद्धिमत्तेची गरज नाही. कोणाला दादोजींसारख्या भल्या माणसाचा पुतळा हवा असे वाटत असेल तर तो त्यांनी हवा तेथे उभारावा, मात्र तो जिजाऊ आणि बालशिवरायांसोबत असूच शकत नाही. कारण दादोजींचा शिवैतिहासाशी संबंध असलाच, तर आदिलशहाचा सुभेदार म्हणून आहे. दादोजींना एकाच वेळीस दोन चाकऱ्या करू द्यायला आदिलशहा नक्कीच दुधखुळा नव्हता. सुभेदार आणि सरकारकून यात मोठा कोण असतो? सुभेदाराचा सरकारकून झाला तर ती पदावनती असते, पदोन्नती नव्हे. हे ज्यांना समजत नाही त्यांनी इतिहास सांगण्याच्या फंदात पडू नये आणि आधी स्वत:च वर्चस्ववादी भावनेतून बाहेर येऊन मोकळेपणाने इतिहास स्वीकारावा. सर्वजण त्यांचे स्वागतच करतील. 



वरील चर्चा वाचता सुद्न्य वाचकांच्या लक्षात येईल कि खरी कळ अकारण कोण काढत आहे? त्यामागे नेमक्या कोणत्या भावना आहेत? अशा पद्धतीने समाज गाडा द्वेषविरहीत कसा चालणार? आम्हाला खोटा इतिहास कितीवेळा कधी उघड तर कधी आडुन सांगणार? कशाला? का उगा त्या शिळ्या कढीला उत आणताय? जे खरे चांगले आहेत त्याबद्दल बोलुयात ना! कशाला दादोजींचे वस्त्रहरण करायला भाग पाडताय? तेही तुमच्याकडे कसलीही उत्तरे नसतांना? आणि कस्तुरे यांना वकील-ए-मुतालिक या पदाचा अर्थच जर माहित नाही तर उगा कशाला इतिहासाबाबत गळे काढावेत आणि दादोजींना नाममात्र सुभेदार म्हणावे? हा सारा बाष्कळपणा सुद्न्यपणे थांबवावा ही त्यांना नम्र सुचना. आजतागायत तुम्ही इतिहासाचा स्वयंपाक करुन हव्या त्या डिश आम्हाला वाढल्या...धन्यवाद...पण आम्ही कधीच या लबाड्या समजु शकणार नाही या भ्रमात राहु नका. वर्चस्ववाद सोडा...




Sunday, October 10, 2010

दादोजी कोंडदेव: भ्रम आणि वास्तव

दादोजी कोंडदेव हे प्रथमपासुन शहाजी राजांचे चाकर होते या भ्रमातुन महाराष्ट्राचे समाजमन ढवळुन काढनारी, संतप्त बनवनारी एक विक्रुत कहाणी जेम्स लेन या स्वता:ला इतिहासकार समजणार्या ग्रुहस्थाने प्रस्रुत केली. पण मुळात हे सत्य नाही. दादोजी कोंडदेव हे आदिलशहाचे १६३६ पर्यन्त चाकर होते आणि ते आदिलशहातर्फे कोंडाना किल्ल्याचे व दौंड प्रांताचे सुभेदार होते. शहाजी राजे तेंव्हा निजामशाहीत होते आणि निजाम आणि आलिलशामधुन विस्तव जात नव्हता. १६३६ मद्धे शहाजी राजे आदिल्शाहा चे सरदार बनले. दादोजींची आदिलशाही सुभेदारी पुढेही कायम झाली पण शहाजी राजांनी त्यांना पुणे जहागिरीवर लक्ष्य ठेवण्यासाठी आपलीही चाकरी दिली. ते सी. के. पी. होते असा एक मतप्रवाह आहे, पण तोही खरा नाही. ते देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण होते. शिरुर तालुक्यातील मलठण हे त्यांचे मुळ गाव. १६३६ साली कोंड्देव शहाजी राजांच्या सेवेत आले आणि ७ मार्च १६४७ रोजी त्यांचे वीष घीवुन आत्महत्त्या केल्याने निधन झाले. (संदर्भ: जेधे शकावली आणि तारीख-इ-शिवाजी)

शिवाजी महाराजांचा जन्म १६३० साली किल्ले शिवनेरी येथे झाला. हा किल्ला तेन्व्हा निजामशाहीत होता. त्या काळी दादोजी कोंडाना किल्ल्यची सुभेदारी आदिलशहातर्फे पहात होते. तो शहाजी राजांच्या जहागिरीत नव्हता....दादोजी जरी पुढे शहाजी राजांतर्फे पुणे-सुपे प्रांताचेही कारभारी नियुक्त झाले असले तरी दादोजी कोंडान्याचे सुभेदारही होतेच...पुढे शिवरायांनी स्वराज्याचा संकल्प सोडुन तसे प्रयत्न केले असले तरीही हयातीत त्यांनी शिवाजीमहाराजांना तो किल्ला मिळु दिला नाही. कोंडाना किल्ला शिवाजी महाराजांनी पुढे १६५७ साली काबीज केला...
१६३६ ते म्रुत्युपर्यंत दादोजी शहाजीराजांच्याही सेवेत होते. शिवाजी महाराज दादोजी सेवेत आले तेंव्हा ६ वर्षांचे होते. अनेक इतिहासकारांच्या मते शिवाजीमहाराज यांना लिहिता वाचता येत नव्हते. दादोजी जर त्यांचे गुरु असते तर असे घडले नसते. दुसरे असे कि दादोजी हे शिवाजीमहाराजांच्या स्वराज्य प्रयत्नांबाबत नेहमीच विरोधात होते. दादोजी हे कोंडाना किल्ल्याचे सुभेदार असुनही त्यांनी हयातीत शिवाजी महाराजांच्या हवाली किल्ला केला नव्हता हेही येथे लक्षात ठेवायला हवे. "तारिख-इ-शिवाजी" असे म्हनते कि शिवाजी महाराजांच्या स्वराज्य-धडपडीला वैतागुन दादोजींनी वीष घेवुन आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या का केली, त्यांचा एक हात घोरपडे सरदारांनी का तोडला याची माहिती पुढे आहेच. त्यासमयी त्यांचे वय ७२ होते. आदिलशहाने शिक्षा म्हणुन दादोजींचा एक हात तोडला (१६४५). त्यावेळी शिवाजीमहाराजांचे वय १५ वर्ष असेल. त्यामुळे युद्धकला दादोजींनी शिवाजी महाराजांना शिकवली असे म्हणता येत नाही...आणि नंतर अवघ्या २ वर्षांत दादोजींचे निधन झाले. 

आता या पार्श्वभुमीवर लेन हा किती महामुर्ख इतिहासकार (?) असेल आणि त्याला विक्रुत माहिती पुरवणारे बाबासाहेब पुरंदरे ते गजानन मेहेंदळे असे १३ हे सर्व वा त्यापैकी काहीजन किती मनोविक्रुत असतील आणि यापैकी कोणीही "शिवप्रेमी" म्हणुन घेण्याच्या लायकीचे कसे नाहीत हे आपले मस्तक आपल्याच धडावर आहे असे समजतात त्या सर्वांनी लक्षात घ्यावे. 

दादोजी कोंडदेव हे प्रथम मलठन या आपल्या गावातुन बराच काळ दौंड प्रांताचा कारभार पहात असत. मलठनला त्यांचा वाडा आजही आहे. १६३६ साली शाहाजी राजांनी दादोजींना आपल्या सेवेत घेउन पहिली कामगिरी दिली ती शिवापुर विकसीत करण्याची. १६३७ साली पुण्यात लाल महाल बांधण्याची कामगीरीही त्यांच्यावर सोपवली गेली. (संदर्भ- जेधे शकावली). १६३६ ते १६३९ या काळात शिवाजी राजे, जीजावु शाहाजी राजांसमवेत बंगलोर येथे वास्तव्यास होते, हेही येथे लक्ष्यात घायला हवे. तेथेच शिवरायांचे पुढील प्रशिक्षण सुरु होते. तत्पुर्वीच शिवाजी महाराजांचे शस्त्र-प्रशिक्षन गोमाजी नाइक पानसंबळ या लखुजी जाधवांनी नेमलेल्या प्रशिक्षकाकडुन जुन्नर (शिवनेरी) पासुनच सुरु झाले होते. या काळात गोमाजी नाइकांच्या सल्ल्यावरुन महाराजांनी लढवैया पठान तुकडीला सेवेत घेतले आणि धर्म-निरपेक्षतेचा पहिला संस्कार राजांवर घडला. बाजी पासलकर हेही राजांचे प्रशिक्षक होते. 

वरील घटनाक्रम पाहिला तर दादोजी हे बाल-शिवाजीचे प्रशिक्षक-गुरु होते हा दावा फोल ठरतो कारण दादोजींना तशी संधीच मिळालेली नाही...ते राजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या धडपडीच्या विरोधात होते व त्याबद्दल शहाजीराजांकडे तक्रारी करत असत, पण १६४६ सालीच तोरणा जिंकुन आपण कोणाची पर्वा करत नाही हे महाराजांनी सिद्ध केले. त्यामुळे दादोजी हे महाराजांचे प्रेरक होते हाही दावा निकालात निघतो. तसेच लाल महाल त्यांच्या देखरेखीत जिजावु आणि महाराजांच्या अनुपस्थितीत बांधला गेला पण त्यांचे (दादोजींचे) वास्तव्य तेथे कधीच नव्हते. ते कोंडाना वा आपल्या मलठन येथील वाड्यात रहात असत. 

शहाजीराजांना निजामशाही सोडुन आदिलशाहीकडे जावे लागले, कारण मोगलांनी निजामशाहीचा अस्त घडवला होता. दादोजी आधीपासुनच आदिलशहातर्फे कोंडाना, दौन्ड आणि लातुर विभागाचा कारभारी म्हनुन काम पहातच होते. पुणे-सुपे प्रांत छोटा होता आणि त्याला फारसे महत्वही नव्हते. पुण्यावरुन मुरारपंत जगदेव या आदिलशहाच्या ब्राह्मण सरदाराने गाढवाचा नांगर फिरवौन ते जवळपास नष्ट केले गेले होते. अशा स्थीतीत आदिलशहाच्या सेवेत यावे लागल्याने शहाजी महाराजांनी या प्रांतासाठी नवी नेमनुक करण्यापेक्षा त्याच विभागातील, आदिलशहाच्या विश्वासातील आणि अनुभवी प्रशासक मानसाला नेमणे स्वाभाविकच होते. एका अर्थाने दादोजी हे १६३६ पासुन एकाच वेळीस दोन व्यक्तींची सेवा करत होते. शहाजीमहाराजांवर आदिलशाहीचा कधीच विश्वास नव्हता कारण त्यांनी पुर्वी स्वराज्यस्थापनेचा प्रयत्न केला होता हे जगजाहीर होते. अशा स्थितीत शिवाजीमहाराजांनीही बंडाची भुमिका घेतल्याने आदिलशाहचे आणि त्याच वेळीस शाहाजीराजांचे प्रतिनिधी असलेले दादोजी यांची पंचाइत झालीच असनार. त्यामुळेच त्यांनी शहाजी राजांकडे शिवाजीराजांबद्दल तक्रार केलेली दिसते. म्हणजेच दादोजींना शिवरायांचे प्रेरक-समर्थक मानता येत नाही आणि तसे म्हनने दिशाभूल करणारे आहे. 

पण शिवापुर आमराइतील आंबा तोडला आणि त्याचा पश्चाताप होवुन त्यांनी शिवाजी महाराजांना हात तोडायची विनंती केली आणि ती शिवरायांनी मानली नाही म्हणुन त्यांनी अर्धा हात कापलेली बाराबंदी घालायला सुरुवात केली ही भाकडकथा इतिहासकारांना (?) (बाबासाहेब पुरंदरे यांना) निर्माण करावी लागली यावरुन या तथाकथित इतिहासकारांना द्न्यातीबांधवाचे काही पाप लपवायचे होते हे स्पष्ट होते. 

येथे आपण तत्कालीन घडामोडी पाहुयात. 

१६२५: शहाजी राजांनी रंगो बापुजी धडफळे यांस पुणे, सुपे प्रांताचा कारभारी म्हणुन नेमले होते. ही जहागिरी शहाजी राजांकडॆ १६२४ साली आली. जर दादोजी आणि शहाजीराजांची पुर्वापार मैत्री असती दादोजी हेच शहाजी राजांचे पहीले कारभारी बनले असते. शहाजीराजे तेंव्हा निजामशाहीत होते तर दादोजी आदिलशहाचे सुभेदार होते. 

१६३०: मुरारीपंत जोगदेव या विजापुरच्या ब्राह्म्न सरदाराने पुण्यावर हल्ला केला आणि पुणे पुरेपुर उध्वस्त करुन त्यावरुन गाढवाचा नांगर फिरवला. अदिलशहा शाहाजी राजांचा द्वेष करत होता हे स्पष्ट होते, कारण शहाजी राजे निजामशाहेचे शासक सरदार बनले होते. पुणे वाचवण्यासाठी आदिलशहाचाच कारभारी असलेल्या दादोजींनी प्रयत्न न करणे स्वाभाविक होते.

त्याच वर्षी शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. हा किल्ला तेंव्हा निजामशाहीत होता व जिजावु गरोदर असतांनाच तेथे शिवाजीराजांचे बंधु संभाजी यांच्या विवाहाप्रित्यर्थ आल्या होत्या. 

१६३६: निजामशाहीचा अंत आणि शहाजी राजांना आदिलशाहेत जाणे भाग पडने. त्याच वर्षी आदिलशहाचाच कारभारी असलेल्या दादोजींना पुणे-सुपे प्रांताचे कारभारी पद दिले. यामागे एकच हेतु असु शकतो तो हा कि नवीन राजकीय समीकरणांशी जुळवुन घायला वेळ मिळावा आणि आदिलशहाचे नवे संकट नको. पण याच वेळेस शहाजी राजे बाल शिवाजी (६ वर्ष वय) आणि जिजावुंना सोबत बगलोर येथे घेवुन गेले. म्हणजेच १६३६ पर्यंत दादोजी आणि भोसले परिवाराचा काडीएवढाही संबंध नव्हता. 

थोडक्यात दादोजी आणि शहाजीराजांची पुर्वापार मैत्री असण्याची शक्यता नाही. शहाजी राजांचा जन्म १६०१ मद्धे झाला. दादोजींचा जन्म १५७५ मधील. निजमशाही आणि आदिलशाही यातुन विस्तव जात नव्हता. पुण्यावर मुरारपंतांनी रानटी हल्ला चढवुनही दादोजींना पुणे वाचावे असे वाटलेले दिसत नाही. (ते कोंडाण्याचे (सिंहगड) सुभेदार होते) आणि याच दादोजींनी त्याच गाढवाचा नांगर एका ब्राह्मणानेच फिरवला त्याच उध्वस्त नगरात स्व:प्रेरणेने सोण्याचा नांगर फिरवण्याचे सोपस्कार केले असतील हे पटत नाही. त्यांनी शाहाजीराजांची इछा आणि आदेश पाळले असेच फार तर म्हनता येते...कारण ही जहागिर भविष्यासाठी त्यांनी हर-प्रकारे राखुन ठेवली...तीच जहागिर त्यांनी आपल्या पहिल्या स्वतंत्र्य लढ्यासाठी वापरली...ती अनेकदा जप्त झाली असली तरी पुन्हा पुन्हा त्याच जहगिरिच्या सनदा मिळवल्या, जी जहागिर आदिलशहाच्या ब्राहमण नोकराने उद्ध्वस्त केली तीच जहागिर त्यांनी आदिलशहाच्याच ब्राह्मण कारभार्याहस्ते पुन्हा उभारुन घेतली...आणि तीच पुण्यभूमी पहिल्या स्वराज्यासाठी आपल्या पुत्रा-हवाली केली. येथे मला शहाजी महाराजांच्या दुरद्रुष्टीचे, कर्तेपणाचे आणि त्यांच्या परकोटीच्या आत्मभानाचे आदर्श सर्वांनी घ्यायला हवे असे वाटते. हेच गुण शिवाजीमहाराजांत स्फुल्लिंगाप्रमाणे त्यांच्या जीवनभर तळपतांना दिसतात. 

या पार्श्वभुमीवर अत्यंत खोटे बिनदिक्कत सांगणार्यांची कीव वाटते... जेथे प्रतिवाद संपतो तेथे "आता जुन्या गोष्टी कशाला उगाळायच्या?" असे काहिसे म्हणुन पळवाट काढली जाते, पण या जुन्या गोष्टॆए ज्यांनी विक्रुत करुन ठेवल्या आहेत, सत्य दडपले आहे-लपवले आहे-लपवण्याचा प्रयत्न होतो आहे त्यांचे काय करायचे? "माझा बाप कोण होता" हे यांनीच बिनदिक्कतपणे सांगायचे....मला माझाच बाप कोण होता या शोधमोहिमेवर पाठवुन द्यायचे...आणि सत्य समोर आले कि जुने कशाला उकरत बसता हे यांचेच आलाप ऐकायचे हा धंदा आता चालणार नाही. मग ते कोणेही असोत...मनोविक्रुतांना कोणत्याही समाजात स्थान नसते. ते नसावे...


आता दादोजींचा हात का तोडला गेला आणि त्यांना वीष घेवुन आत्महत्या का करावी लागली याबद्दल: 

सन १६४५. एक जिजावुंनी दिलेला निवाडा जो दादोजींशी संबधीत आहे. हकीकत अशी (संदर्भ: शिवकालीन निवाडे) रंगनाथ गनेश सोनटक्के हे कस्बे जिन्ती, परगना श्रिगोन्दे येथील कुलकर्नी वतन पहात असत. ते जमा महसुल घेवुन महसुलाचा हिशोब द्यायला दादोजी कोंडदेव यांच्याकडे कोंडाना मुक्कामी आले. आधीचे हिशोब आणि आताचे हिशोब जुळत नसल्याने दादोजींशी सोनटक्के यांचे भांडन झाले पण तदनंतर दादोजींनी त्यांना भोजन प्रित्यर्थे आपल्या निवासी निमंत्रीत केले. रात्री भोजनानंतर (भोजनात वीष घातले असल्याने) त्यांचा दादोजींच्याच निवासस्थानी म्रुत्यु झाला. तदनंतर रंगनाथ यांचे पुत्र विसाजी रंगनाथ सोनटक्के यांनाही दादोजींनी धमक्या दिल्या. यामुळे प्रक्षुब्ध होवुन भानाबाई विसाजी सोनटक्के या जिजावुन्च्या दरबारी आल्या व तक्रार गुदरली. जीजावुंनी तपास करुन दादोजी हे दोषी आहेत याची खात्री करुन घेतली आणि भानाबाईंना भरपाइ म्हणुन बाभ्हुळ्गाव येथे बिघे १२० चावर १८० अशी जमीन स्वता: सनद करुन दिली आणि दादोजींना बोलावुन फैलावर घेतले. 

यावरुन माझ्यासमोर आलेली ही हकिकत जी ऐतिहासिक निवाड्यांवरुन सिद्ध होते, हे स्पष्ट दिसते कि दादोजी हे आदिलशहाचा महसुल हडपत होते. तसाच ते शहाजीराजांचा महसुल हडपत नसतील असे नाही. ही घटना १६४५ ची आहे. दादोजींनी वीषप्रयोग करुन एका स्व-बांधवाची हत्या केली आहे. ही वार्ता आदिलशहा आणि शहाजी राजांना कळाली असनारच आणि त्याचीच परिणती म्हनजे १६४६ साली दादोजींचे प्राणावरुन हातावर निभावणे (कारण ब्रह्महत्या हे महापापात गणले जात होते...म्हणुन) आणि तदनंतर स्वत:च वीष घेवुन आत्महत्या करणे. 

थोडक्यात दादोजी कोंड्देव हे कोनत्याही समाजाला आदर्श वाटावेत असे व्यक्तिमत्व दिसत नाही. ते शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. ते शहाजी राजांचे आपत्कालीन परिस्थितीत नेमले गेलेले कारभारी होते. ते एकाच वेळेस आदिलशहा आणि शहाजीराजांचे सेवक होते, ही दुहेरी निश्ठा कोणत्याही स्वाभिमानी माणसाला शोभणारी नव्हे. १६३६ पुर्वी शहाजीराजे आणि दादोजींची मैत्री असण्याचेही पुरावे नाहीत आणि तशी शक्यताही नाही. पुणे सर्वप्रथम (१६३०) मुरारपंत जोगदेवाने उद्द्वस्त केले त्याला जवळच सुभेदारी करणार्या दादोजींनी कसलाही विरोध केलेला दिसत नाही. त्याच उद्ध्वस्त गावात सोण्याचा नांगर चालवल्याचे श्रेय त्यांना देता येत नाही. त्यांनी एका ब्राह्मणाचाच खुन केला आहे असे इतिहासावरुन दिसते. हा खुन त्यांनी आपला भ्रष्ट आचार लपवण्यासाठी केला आणि त्याची शिक्षा त्यांना त्यांचे हुजुर आदिलशहाने दिली आणि त्याचीच परिणती त्यांच्या आत्महत्येत झाली असे एकुन घटनाक्रमावरुन दिसते. ते शिवरायांचे प्रेरकही नव्हते कारण ते सतत शहाजी राजांकडे शिवरायांच्या स्वरज्य प्रयत्नांबद्द्ल कागाळ्या करत असत. सिवरायांनी १६४६ साली तोरणा जिंकला...पण हयातीत कोंडाना किल्ला त्यांनी शिवरायांच्या हवाली केला नाही कारण ते आदिलशहाचेही निष्ठावंत सेवक होते. ते शिवरायांचे गुरु असु शकत नाहीत...नव्हते हेही पुराव्यांवरुनच सिद्ध होते. 

अशा स्थितीत त्यांचे कोड आजही कोणी पुरवायचे हा ज्याचा त्याचा आणि ज्याच्या त्याच्या नैतिक जाणीवेंचा प्रश्न आहे. ब्राहमणी टेकु असल्याखेरीज कोणी श्रेष्ठ होवु शकत नाही हा जातीय अहंकार आता चालणार नाही. पुरअवे मुद्दाम धुसर करणे, दडपणे आणि असत्य ठासुन रेटणे याला काही केल्या इतिहासकार म्हणता येणार नाही.


Comments

Popular posts from this blog

चांभारानी गणपती शिवल्या मुळे गणपती बाटला. म्हणून गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...!☝

अयोध्या

चोरावर मोर आणि पोपटपंची